ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
By अजित मांडके | Published: May 18, 2024 05:03 PM2024-05-18T17:03:30+5:302024-05-18T17:04:53+5:30
ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
![lok sabha election 2024 conquer thane and prove a stronghold says deputy chief minister devendra fadnavis | ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन lok sabha election 2024 conquer thane and prove a stronghold says deputy chief minister devendra fadnavis | ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/df_2024051233373.jpg)
ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
अजित मांडके,ठाणे : ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाण्यात १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणुक ही प्रतिष्ठेची असून ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा, मी गुलाल उधळायला येतो असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाण्यात शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले. ठाण्याची जागा अधिक मताधिक्याने येणार असल्याच्या आकडेवारीत आहेत. परंतु त्यामुळे गाफील राहू नका, अधिकाधिक मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा असेही ते म्हणाले. २० तारखेला आराम करायचा नाही. आधी स्वत: कुटुंबासह मतदान करायचे त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे.
महायुतीला मतदान करायचे हे जनतेनं ठरवलं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी ठाणे जिकांयचे असल्याचेही ते म्हणाले. परंतु दुसरीकडे नगरसेवकांनी देखील या निवडणुकीत काम करुन दाखविले पाहिजे, पुढील काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आता पासून त्याची तयारी करा अन्यथा तुमचे प्रगती पुस्तक कसे असेल हे लक्षात ठेवा, त्या प्रगतीपुस्तकावरच तुमचे काय करायचे हे ठरविले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचा देखील खरपुस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. परंतु ते ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात का? अशी खिल्ली त्यांनी उडवली. तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितले. पुढील १० वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. महायुती विकासाचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्याच देतात आमची शिवसेना आणि त्यांची शिव्या सेना आहे अर मुख्यमंत्री म्हणाले. मोदी नकली सेना म्हणाले तर मग उद्धव ठाकरेंना मिरची का झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू? असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतानचे नारे लावू शकते का? याकूब मेमन कबर, पाकिस्तानचे झेंडे वापरत आहे, प्रचारात व्होट जिहाद मागत आहे. मग ती काय आहे? असली शिवसेना कसली नकलीच शिवसेना आहे. असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत पण विचाराचे नाही. राज ठाकरे, एकनाथ शिंदे हे विचाराचे वारसदार आहे. उद्धव ठाकरेंना आरएसएस ध्वज फडके वाटते, शिव भगवे ध्वज फडके वाटू लागेल. आज भारत कोणालाही रोखू शकतो. आपण नवभारतासाठी काम करत आहोत. लोकांच्या मनात मोदी असल्याचे सांगत तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान बनवायचे असंही फडणवीसांनी सांगितले.