Mumbai Traffic: काम मोठंय पण आम्ही पूर्ण करणार, आयुक्त संजय पांडेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 08:17 PM2022-03-18T20:17:47+5:302022-03-18T20:27:19+5:30

मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत.

राजधानी मुंबई म्हणजे वाहतूक कोंडी आणि गर्दी. त्यातच मुंबईत पार्किंगची मोठी समस्या असते. अशातच मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने सतत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक कोंडी (Traffic Jam) असल्याचे चित्र पाहायला मिळतं.

यातच रस्त्यांवर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेकवेळा वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात, मग पोलीस ते टोईंग करून घेऊन जातात.

यासंदर्भातच आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठं पाऊल उचलत वाहनधारकांना गोड बातमी दिली होती. संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, मुंबईत वाहतूक पोलिसांकडून वाहन टोईंग थांबण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक जागांवर असलेली खराब आणि भंगार गाड्यांचे टोईंग आता आयुक्त संजय पांडेंनी सुरू केले आहे. त्यासाठी, मुंबई महापालिकेची मोठी मदत होत आहे. तसेच, काम मोठंय पण आम्ही निर्धार केलाय, असेही संजय पांडे यांनी म्हटलंय

संजय पांडेंनी आज पुन्हा एकदा ट्विट करुन मुंबईतील स्क्रॅप गाड्यांचे टोईंग करतानाचे फोटो, या गाड्या रस्त्यावरुन हटवितानाचे फोटो शेअर केले आहेत. मुंबई महापालिकेनेही काही फोटो करत माहिती दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात रस्त्यांच्या कडेला बेवारस अवस्थेत सोडून दिलेली पर्यायाने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने धडाक्यात सुरु केली आहे.

मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत.

विहित मुदतीत मध्ये प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

मुंबई स्वच्छतेचं बीएमसीचं हे काम सध्या प्रगतीपथावर दिसून येत आहे