असमान वाटप आणि नियोजनाअभावी मुंबईत ठिकठिकाणी पाण्याची बोंब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:25 AM2019-01-07T02:25:06+5:302019-01-07T02:25:55+5:30

पाणीचोरी व गळती ही समस्या काही नवीन नाही़ पाऊस कमी झाला की या समस्येकडे महापालिका लक्ष केंद्रित करते़ नियोजनाचा अभाव, टँकर माफियांचे जाळे, भ्रष्ट अधिकारी या सर्वाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो़ या शहारातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी दररोज भांडण करावे लागते़ काही ठिकाणी तर पाणीटंचाईमुळे एक दिवस पाणीच येत नाही़ पाण्यासाठी अवाच्चा सव्वा पैसे मोजावे लागतात़ पाण्याच्या समस्येने मुंबईकरांना ग्रासले आहे़ त्याचा ‘लोकमत’ टीमने घेतलेला आढावा.

Water supply in Mumbai everywhere due to uneven distribution and lack of planning | असमान वाटप आणि नियोजनाअभावी मुंबईत ठिकठिकाणी पाण्याची बोंब

असमान वाटप आणि नियोजनाअभावी मुंबईत ठिकठिकाणी पाण्याची बोंब

googlenewsNext



शेफाली परब-पंडित 

मुंबई : घराघरांत २४ तास पाणीपुरवठा ही महापालिकेची घोषणा दिवास्वप्नच ठरली आहे. पाण्याची मागणी, पायाभूत प्रकल्प, बांधकामे वाढली, तरी आजही पावसाच्या पाण्यावरच महापालिकेची मदार आहे. त्यात पाणीगळती आणि चोरीत दररोज नऊशे दशलक्ष लीटर वाया जात असल्याने, मुंबईकरांची वणवण थांबलेली नाही, तर असमान वाटपामुळे पाण्यासारख्या मूलभूत हक्कापासून अनेक विभाग वंचित आहेत. परिणामी, मुंबईत पाणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

पाण्याची मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत असल्याने अपुऱ्या पाणीपुरवठ्याची तक्रार होत असते. ही दरी दूर करण्यासाठी दूरगामी नियोजनावर तत्कालीन आयुक्त सुबोधकुमार यांनी भरही दिला होता. त्यानुसार, मध्य वैतरणा, गारगाई-पिंजाळ आदी प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले. अशा प्रकल्पांच्या जोरावर मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविण्यात आले. पावसाने दगा दिल्यानंतर पाण्याचे नियोजन बिघडून मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो़

वाटपातील असमानतेने ठिकठिकाणी तक्रारी
गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या उपनगरांमध्ये स्थलांतरित झाली. मात्र, पाण्याच्या वाटपात काही बदल झाले नाहीत. त्यामुळे कुलाबा, फोर्ट ते सायन, माहिम या शहर भागातील ३१ लाख ४२ हजार लोकसंख्येला दररोज ११६० ते ११७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. त्याच वेळी ३१ लाख २२ हजार लोकसंख्या असलेल्या गोरेगाव ते दहिसर या पश्चिम उपनगरातील विभागांना ७३० दशलक्ष लीटर दररोज पाणीपुरवठा होत आहे. विभागातील लोकसंख्येनुसार पाण्याचे वाटप व्हावे, यासाठी काही वर्षांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाण्याचे वाटप असमानच असल्याने अनेक विभागांमध्ये अपुºया पाण्याची तक्रार आहे.

मुंबईला कुठे २४ तास पाणीपुरवठा करणार होते आणि आज २४ मिनिटेही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिकेचे जल अभियंता खाते फेल गेले आहे. पाण्याच्या असमान वाटपामुळे गोंधळ उडत आहे. पाणीटंचाईच्या काळात मुंबईची तहान भागविण्यासाठी कोणताही आपत्कालीन आराखडा नाही. यामुळेच मुंबईत आज पाणी परिस्थिती बिकट आहे.
- रवि राजा, विरोधी पक्ष नेते
तलावांमध्ये मर्यादित जलसाठा असला, तरी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुंबईतील जलाशय ब्रिटिशकालीन असल्याने पाण्याची आवश्यक पातळी राखण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. पाण्याचे नियोजन सुरू असून, लोकांच्या तक्रारी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- यशवंत जाधव,
स्थायी समिती अध्यक्ष
दहा टक्के पाणीकपात असली, तरी अनेक विभागांमध्ये पाणी मिळत नाही. ही परिस्थिती आता आहे, तर उन्हाळ्यात काय हाल होतील. यासाठी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. - राखी जाधव,
गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस
 

Web Title: Water supply in Mumbai everywhere due to uneven distribution and lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.