विद्यापीठाने गुणवत्ता राखावी

By Admin | Published: November 18, 2014 10:46 PM2014-11-18T22:46:56+5:302014-11-18T23:35:56+5:30

जी. डी. यादव : शिवाजी विद्यापीठाचा ५२वा वर्धापनदिन उत्साहात

University should keep quality | विद्यापीठाने गुणवत्ता राखावी

विद्यापीठाने गुणवत्ता राखावी

googlenewsNext

कोल्हापूर : जगात गुणवत्तेला पर्याय नाही. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठाने कार्यरत राहावे. नवीन ज्ञानाची निर्मिर्ती हा कोणत्याही विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू असतो आणि त्याची पूर्तता शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आणि माजी विद्यार्र्थी या चार प्रमुख स्तंभांच्या सक्षमतेवर अवलंबून असते. या चार स्तंभांची एकत्र सांगड घातल्यास विद्यापीठाची वाटचाल योग्य प्रकारे होते, असे प्रतिपादन माटुंगा (मुंबई) येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांनी आज, मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. विद्यापीठाच्या राजर्र्षी शाहू (सिनेट) सभागृहात कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार म्हणाले, विद्यापीठाच्या पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा कृतिशील आराखडा आम्ही तयार केला असून, त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. यादव यांच्या हस्ते विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक, विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या गुणवत्ताधारक पाल्यांचा, प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांना पारितोषिके देऊन गौरविले. दरम्यान, आज सकाळी कुलगुरू डॉ. पवार व प्रमुख पाहुणे कुलगुरू प्रा. यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बीसीयूडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील तसेच विद्यार्र्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यापीठामुळे मी घडलो
मूळचे अर्जुनवाडा (जि. कोल्हापूर) येथील असलेल्या प्रा. यादव यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले नसते, तर आपण उच्च शिक्षण घेऊच शकलो नसतो; कारण पुण्याला जाऊन शिकण्याइतकी घरची परिस्थिती नव्हती, असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. आज मी जो काही आहे, तो या विद्यापीठामुळे, असे सांगताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या.

मान्यवरांचा सत्कार
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक डॉ. शैलजा माने (सहयोगी प्राध्यापक, कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे, जि. सातारा), बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अशोक हजारे (कॉलेज आॅफ फार्मर्सी, मोरेवाडी, जि. कोल्हापूर), प्राचार्य सुमतीबाई पाटील, आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शिक्षिका डॉ. प्रज्ञा घोरपडे (आर्टस् अ‍ॅँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव), विद्यापीठातील गुणवंत सेवक रमेश गवळी (अधीक्षक), सुरेखा आडके (वरिष्ठ सहायक), आनंदा वारके (शिपाई), महाविद्यालयीन गुणवंत सेवक संतोष गायकवाड (मुख्य लिपिक, बाळासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी).

Web Title: University should keep quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.