सेन्सेक्स गेला 30 हजारांपार
By admin | Published: April 27, 2017 01:26 AM2017-04-27T01:26:18+5:302017-04-27T01:26:18+5:30
भांडवलाचा जोरदार अंत:प्रवाह, जागतिक बाजारातील तेजी आणि दिल्ली महानगर पालिका निवडणुकांत भाजपाचा दणदणीत विजय
मुंबई : भांडवलाचा जोरदार अंत:प्रवाह, जागतिक बाजारातील तेजी आणि दिल्ली महानगर पालिका निवडणुकांत भाजपाचा दणदणीत विजय यामुळे उत्साहित झालेल्या शेअर बाजारांनी बुधवारी विक्रमी झेप घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स प्रथमच ३0 हजार अंकांच्या वर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही विक्रमी पातळीवर बंद झाला अहे.
३0 कंपन्यांचा सेन्सेक्स १९0.११ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी वाढून ३0,१३३.३५ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांकी बंद ठरला आहे. या आधी ५ एप्रिल रोजी सेन्सेक्स २९,९७४.२४ अंकांवर बंद झाला होता. हा उच्चांक सेन्सेक्सने मोडला. तसेच ४ मार्च २0१५ रोजीच्या सर्वोच्च ३0,0२४.७४ अंकांच्या इंट्रा-डे पातळीलाही त्याने आज स्पर्श केला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने ७६८.0५ अंकांची वाढ नोंदविली आहे.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ४५.२५ अंकांनी अथवा 0.४९ टक्क्यांनी वाढून ९,३५१.८५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचाही हा विक्रमी बंद ठरला. कालचा ९,३0६.६0 अंकांच्या बंदचा विक्रम निफ्टीने मोडला. तसेच या आधीचा ९,३0९.२0 अंकांचा इंट्रा-डे विक्रमही त्याने मागे टाकला.
सेन्सेक्समधील ३0 पैकी १८ कंपन्यांचे समभाग वाढले आणि १२ कंपन्यांचे समभाग घसरले. वाढ मिळविणाऱ्या बड्या कंपन्यांत आयटीसी, एमअँडएम, एचडीएफसी, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, मारुती, एचडीएफसी बँक आणि एशिएन पेंट्स यांचा समावेश आहे. याउलट अदाणी पोर्ट्स, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, पॉवर ग्रीड, रिलायन्स, $ि$िवप्रो आणि ओएनजीसी यांचे समभाग घसरले. आशियाई बाजारांपैकी टोकिओचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग, आणि शांघाय कंपोजिट या सर्व प्रमुख बाजारांचे समभाग वाढले. युरोपातील पॅरीसचा कॅक-४0, लंडनचा एफटीएसई-१00 आणि फ्रँकफूर्टचा डॅक्स-३0 हे निर्देशांक सकाळी संमिश्र कल दर्शवित होत.
रुपयाही उच्चांकावर-
बुधवारी रुपया १५ पैशांनी वाढला. त्याबरोबर, एक डॉलरची किंमत ६४.११ रुपये झाली. हा रुपयाचा २१ महिन्यांचा उच्चांक आहे. १0 आॅगस्ट २0१५ नंतरचा हा सर्वोच्च बंद ठरला आहे. त्याचप्रमाणे, रुपयाची ही सलग तिसऱ्या सत्रातील तेजी ठरली. शेअर बाजारातील विक्रमी वाढीबरोबर रुपयाही तेजीत असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत मिळत आहेत.