झोपड्यांवर सावट दरडींचे!मुंबई महापालिका प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 03:58 AM2018-04-17T03:58:31+5:302018-04-17T03:58:31+5:30

येथील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास अवघा दीडएक महिना शिल्लक असतानाही महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दरडीवर वास्तव्य करत असलेल्या झोपडीधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

The Mumbai Municipal Administration's hatred! | झोपड्यांवर सावट दरडींचे!मुंबई महापालिका प्रशासन हतबल

झोपड्यांवर सावट दरडींचे!मुंबई महापालिका प्रशासन हतबल

Next

मुंबई : येथील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास अवघा दीडएक महिना शिल्लक असतानाही महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दरडीवर वास्तव्य करत असलेल्या झोपडीधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. झोपड्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय उचित कार्यवाही करत नसल्याने हा प्रश्न दर पावसाळ्यात समोर येत आहे.
मुंबई महापालिकेच्या एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर मोठया प्रमाणावर झोपड्या आहेत. येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
स्थानिक रहिवाशांनी स्वत:हून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर तेथे रहावे. नैसर्गिक आपत्तीने दुर्घटना, जीवित, वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार
नाही, असे म्हणत पालिकेने हात वर केले आहेत.

समन्वयाचा अभाव
- १९९२ सालापासून सुरक्षा भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.
- संरक्षक भिंत हा कायमचा उपाय नाही.
- झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए, पालिकेच्या प्रकल्प बाधितांसाठी राखीव घरांमध्ये होणे गरजेचे आहे.
- महापालिका, जिल्हाधिकारी, म्हाडामध्ये समन्वय नाही.
- झोपड्यांचे सर्वेक्षण झाले. मात्र संरक्षक भिंतीची देखभालीचा प्रश्न निरुत्तरित आहे.
- दरडीलगतचे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.


- मुंबईतील अनेक टेकड्या, डोंगर परिसरात व पायथ्याशी सुमारे २० हजार झोपड्या धोकादायक स्थिती वसल्या आहेत.
- झोपड्यांमध्ये सुमारे लाखभर रहिवासी गेली अनेक वर्षे मृत्यूच्या दाढेत दिवस काढत आहेत.
- झोपड्यांना स्थलांतरित करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात नोटीस
बजावण्यात येते.
- मुंबईत जागेची टंचाई आणि डोक्यावरचे छप्पर हरविण्याच्या भीतीने हजारो मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

- गतवर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अशा २८४ ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका होता.
- गेल्या २० वर्षांमध्ये दरड कोसळून २०९ लोकांचा बळी गेला आहे.
- ग्रँट रोड, भांडुप, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि मालाड या भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असणारी ठिकाणे आहेत.

- १९९२ ते २०१३ या काळात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत २६० जणांचा मृत्यू झाला. तर २७० जण जखमी झाले.
- २४ तासांत सरासरी २०० मिलीमीटर पाऊस पडला तर साधारणत: दरड कोसळण्याच्या घटना घडतात.
- खडकातली पाणी शोषण्याची क्षमता संपली की त्यात भेगा पडतात. परिणामी, पाणी बाहेर पडून दगडाचा काहीसा भाग सुटतो आणि ढासळू लागतो.
- दरड कोसळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती रोखता येणार नाही. मात्र त्यासाठी पुरेशी काळजी घेणे शक्य आहे.

- २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर संबंधित ठिकाणी सुरक्षेचा इशारा दिला तर दुर्घटनांमधील जीवितहानी टाळता येईल.

- गौतमनगर, पांजरापोळ, वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर आदी ठिकाणच्या टेकडीच्या/ डोंगराच्या उतारावर मोठया प्रमाणावर झोपड्या आहेत.

Web Title: The Mumbai Municipal Administration's hatred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई