रेंगाळतेय मनात अजूनही... आठवण त्या भेटीची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:44 AM2018-02-14T05:44:04+5:302018-02-14T05:44:24+5:30

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या मंगेश पाडगावकरांच्या कविता आजही प्रेमाचे महत्त्व सांगतात. मात्र प्रेम सेम असलं, तरी प्रेमात पडण्याची जागा आणि ठिकाणं मात्र वेगवेगळी असतात. अशाच काही असामान्य होत असलेली सामान्य ठिकाणं आणि जागांमधील गुलाबी आठवणींना फुंकर देण्याचा प्रयत्न ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने...

 Loneliness still remember ... that visit to the mind! | रेंगाळतेय मनात अजूनही... आठवण त्या भेटीची!

रेंगाळतेय मनात अजूनही... आठवण त्या भेटीची!

Next

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या मंगेश पाडगावकरांच्या कविता आजही प्रेमाचे महत्त्व सांगतात. मात्र प्रेम सेम असलं, तरी प्रेमात पडण्याची जागा आणि ठिकाणं मात्र वेगवेगळी असतात. अशाच काही असामान्य होत असलेली सामान्य ठिकाणं आणि जागांमधील गुलाबी आठवणींना फुंकर देण्याचा प्रयत्न ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने...

बागेतील निरागस प्रेम
६० ते ७०च्या दशकापासून आजही प्रेमीयुगुलांची प्रेम व्यक्त करण्याची पहिली पसंती ही बागेलाच असते. निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या भावना व्यक्त करताना प्रेमीयुगुल तासन्तास बागेत बसलेले दिसतात. हातात हात घेऊन मनसोक्त गवतावर फिरणारे काही क्षण कधी आयुष्यभरासाठी एकत्र आले, ते कळत नाही.
प्रेमीयुगुलांना एकांत देणारे ठिकाण म्हणून पूर्वी बागेकडे पाहिले जायचे तसेच आजही फिरण्यासाठी अनेक पर्यायांनंतरही प्रेमीयुगुलांना ‘बाग’ हीच हक्काची जागा वाटते. या भेटी काही वेगळ्याच असायच्या. सोशल मीडिया आणि एकूणच संपर्काचे माध्यम कमी असल्याने बागेत भेटल्यावर रुसवेफुगवे, तक्रारी, गप्पा हे प्रकार प्रेमात घडायचे. मात्र, बागेतील ती गंमत सोशल मीडियामुळे आजघडीला दिसत नाही. बागेतील त्या निरागस भेटी पुढे कितपत टिकतील, यात शंकाच आहे. मात्र त्या भेटींमधील आठवणी या कैक वर्षे टिकतील, हे मात्र नक्की.

चाळीतील अल्लड प्रेम
चाळ आणि चाळीत जुळलेली ती मनं... चाळीत फुललेल्या प्रेमाच्या या अल्लड नात्याला पुस्तकचं नव्हे, तर नाटक आणि चित्रपटांनी कित्येकदा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबापुरीतील चाळींमध्ये रंगलेल्या प्रेमकथांना मोठ्या पडद्यावर दाखविण्यापासून केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीही स्वत:ला रोखू शकली नाही. आजही बहुतेकांना चित्रपटात दिसणारी चाळीतील प्रेमकथा आपलीच असल्याचे वाटते.
मुंबापुरी वसवणाºया कामगार वर्गातील अनेक युवक आणि युवतींमधील प्रेमाच्या नात्याचा याच चाळींतून जन्म झाला. एकाच गल्लीतून जाताना होणारी ती नजरानजर आजही मनाला स्पर्शून जाते. फोन करणे दूरच, मात्र शेजाºयांपासून गल्लीतील मित्रमंडळींचा डोळा चुकवून प्रेयसी किंवा प्रियकराला चिठ्ठी पोहोचविण्याचे ते धाडस आजही हवेहवेसे वाटते. चाळी बैठ्या असो वा दुमजली, त्यातील प्रेमकथा ही तितकीच निराळी असते.
आज चाळींची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली असली, तरी व्हॅलेंटाइन डे साजºया करणाºया लाखो जोडप्यांच्या मनात चाळीतील ते अल्लड प्रेम आजही घर करून आहे. उद्या, मायानगरीतून चाळी नामशेष झाल्यावरही प्रत्येक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने चाळीतील प्रेमाच्या आठवणी मात्र उभ्या राहतील, यात शंका नाही.

बस स्टॉप नव्हे, ‘लव्ह’स्पॉट!
प्रेम होण्याच्या किंवा करण्याच्या जागांमध्ये मुंबईतील बस स्टॉप कधीच दुर्लक्षित करून चालणार नाही. अनेक प्रेमकहाण्या या बस स्टॉपवरच घडल्याचे ऐकले असेल. सुरुवातीला बस स्टॉपवर असताना ‘त्या’ने फक्त ‘ती’च्याकडे एकटक बघणे आणि ‘ती’ने तिरकस नजरेने बघणे. ही बहुतेक प्रेमीयुगुलांना आपलीच कथा वाटते. असाच खेळ प्र्रत्येक बस स्टॉपवर दिसून येतो. हळूहळू ‘ती’ने आपल्याकडे कधी रागाने तर कधी लाजून पाहणे नित्याचे होते. दररोज ‘ती’ आणि ‘तो’ एकाच वेळी बस स्टॉपवर येणार आणि एकाच बसने प्रवास करणार. परंतु कधी कोणी आले नाही तरी त्याच्या वाटेकडे डोळे लावून वाट बघत राहणार. मग नेहमीची बस सोडून ‘ती’ किंवा ‘तो’ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वाट बघत राहणार. ऊन, पाऊस, वारा काहीही असो न चुकता बस स्टॉपवर येऊन वाट बघत राहणे हा दिनक्रम होऊन जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनतो हे कळतच नाही. कैक मुंबईकरांनी येथील बस स्टॉपवरच जोडीदारासोबत एकत्र जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या असतील. आपल्या साथीदाराची निवड केली असेल. त्यामुळे हजारो प्रेमवीरांना याच बस स्टॉपमध्ये आपला ‘लव्ह’स्पॉट वाटत असेल, तर त्यात नवल वाटायला नको.

नाकासमोर चालणारी ती ‘नाक्या’वरच प्रेमात पडते...
नाक्याने जसे ‘भाई’ जन्माला घातले तसेच ‘प्रेम’देखील फुलवले. मग तो नाका कॉलेजचा असो, गल्लीचा असो, चाळीचा असो, रस्त्यावरचा असो, नाहीतर ‘दिल्ली’चा असो. एक काळ असा होता की चालत्याबोलत्या नाक्याने पोरांची आयुष्य मार्गी लागली. आजही लागत आहेत. स्वप्नातील परी प्रत्यक्ष नाक्यावर यावी आणि पोरांच्या जिवाला हुरहुर लागावी; हे काही नवे नाही. आज हे नाके फारसे प्रेमाने बहरत नाहीत. कारण प्रेम व्यक्त करण्याची साधने बदलली आहेत. मात्र प्रेम तेच आहे. आज नाकाही तोच आहे. मात्र पिढ्या बदलत आहेत. पोरगी कामानिमित्त घरातून बाहेर पडल्यावर नाक्यावर येईपर्यंत; सुरू झालेला शिट्ट्यांचा पाऊस आजही पडतो. ‘तिच्या’साठीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही ‘तो’ नाक्यावर ताटकळत असतो. सुरुवातीला ‘नकार’ असलेला सूर हळुवार का होईना ‘होकारा’त बदलत असतो; आणि संसार मार्गी लागत असतात. पण यासाठी झुरावे लागते. ‘युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं...’ असे म्हणत झुरणारा ‘तिच्या’साठी शेवटच्या क्षणापर्यंत स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत असतो. ‘तिचा’ नकार येईल की होकार, यावर सर्वकाही असते. पण तो आशा सोडत नाही. कारण ‘त्याचे’ प्रेम खरे असते. सात जन्माच्या गाठी जेव्हा बांधल्या जातील तेव्हा बांधल्या जातील; पण ‘हा रस्ता कठीण आहे...’ असे म्हणत ‘नाका’ तिच्या प्रेमाने बहरून निघतो. आता तर ‘ती’देखील ‘त्याची’ वाट पाहते. ‘तो’ नाक्यावर येण्यापूर्वीच ‘ती’ नाक्याची वाट चालू लागते. घरच्यांचा डोळा चुकवून नाक्याच्या वाटेने चालणाºया ‘तिच्या’ पावलांना ‘त्याचे’ मित्र दिसले; आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला की ‘ती’ जे काही समजायचे ते समजून जाते. नकळतच हा नाका एकमेकांना मनाने जवळ आणतो. नजरेला नजरा भिडतात आणि एकमेकांवर खिळतातसुद्धा. आता फक्त व्यक्त होण्याचे निमित्त असते. पहले आप, पहले आप... असे म्हणत नेहमीप्रमाणे ‘तो’ एकदाचे ‘तिला’ प्रपोज करतो; आणि नाक्यावरच्या प्रेमाचा शेवट गोड होतो.

तो, ती आणि समुद्र...
अनेकांच्या लव्हस्टोरीज्मध्ये समुद्र महत्त्वाची भूमिका बजावतो. मरिन ड्राइव्ह, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बँड स्टॅण्ड, गोराई, मढ, अक्सा, मार्वे, दाना पाणी, वर्सोवा अशा अनेक समुद्रकिनाºयांवर मुंबईतील प्रेमवीरांच्या प्रेमाला उधाण येते. अनेकांच्या नात्यातील प्रेम समुद्राच्या भरती आणि ओहोटीप्रमाणे कमी-जास्त होते. याच समुद्रकिनाºयांवर कित्येकांच्या प्रेमकहाण्या फुलल्या आहेत.
बॉलीवूडनेदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्रकिनारी फिरणारी जोडपी दाखविल्याने त्याचा परिणाम मुंबईकरांवर दिसून येतो. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविण्यासाठी अनेक जण समुद्राची निवड करतात. समुद्रकिनारी त्याच्या/ तिच्यासोबत बसून सूर्यास्त पाहणे, भेळपुरी खाणे, वाफाळलेला चहा पिणे ही प्रेमात पडलेल्या मुंबईकरांची पसंती.
कित्येकांनी त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी समुद्रकिनाºयाचीच निवड केली आहे. आजही तोच ट्रेंड फॉलो केला जात आहे. म्हणूनच प्रत्येक व्हॅलेंटाइन वीकमध्ये स्पेशल दिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘ती’ किंवा ‘तो’ समुद्रकिनाºयाची निवड करतात. मग तो ‘रोझ डे’चा गुलाब असो किंवा ‘प्रपोज डे’चा प्रपोज. ‘हग डे’च्या दिवशी तिला/त्याला मिठीत घेण्यासाठी वा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी अनेकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन समुद्रच आहे.

 

Web Title:  Loneliness still remember ... that visit to the mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.