‘नाती तोडणारे नव्हे जोडणारे’ कुटुंब न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:53 AM2018-02-15T03:53:49+5:302018-02-15T03:53:55+5:30

व्हॅलेंटाइनसाठी मुंबईत तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो़ जोडप्यांसाठी प्रचलित असलेल्या ठिकाणी गर्दी असते़ हा प्रेमाचा दिवस बुधवारी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयातही साजरा झाला.

Family Court "Connecting Not to be Broken" | ‘नाती तोडणारे नव्हे जोडणारे’ कुटुंब न्यायालय

‘नाती तोडणारे नव्हे जोडणारे’ कुटुंब न्यायालय

googlenewsNext

- कुलदीप घायवट

मुंबई : व्हॅलेंटाइनसाठी मुंबईत तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो़ जोडप्यांसाठी प्रचलित असलेल्या ठिकाणी गर्दी असते़ हा प्रेमाचा दिवस बुधवारी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयातही साजरा झाला़ विवाह तोडण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या जोडप्यांचा संसार नव्याने मांडण्याचे काम या न्यायालयाने केले व अशा जोडप्यांचा सत्कार केला़ ‘नाते जुळले मनाशी मनाचे’ या शीर्षकाने प्रेमाचा दिवस कुटुंब न्यायालयाने साजरा केला़ कुटुंब न्यायालय नाती तोडत नाही, तर जुळवते, असा सूर सर्वच मान्यवरांनी या वेळी लावला़
जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येतो. याच दिवशी नवनवीन नाती जोडली जातात. अशाच तुटू पाहणाºया नात्यांना जोडण्याचे काम कुटुंब न्यायालयाने यशस्वी केले आहे. आयुष्य पुन्हा नव्याने उभारण्याची स्वप्न मनात घेतलेल्या जोडप्यांना रोपटे, चॉकलेट, रेखाचित्र देऊन त्यांना व्हॅलेंटाइन गिफ्टही देण्यात आले. १०० कुटुंबे तोडल्याने आनंद होत नाही, तर एक कुटुंब जोडल्याने खूप आनंद होतो. प्रेम हे कधी आणि कुठेही होते; परंतु ते प्रेम संपवण्याची जागा म्हणून कुटुंब न्यायालयाकडे धाव घेतली जाते. कुटुंब न्यायालय म्हणजे पुन्हा मिलन करण्याचीही जागा आहे, अशी ओळख आहे. वरिष्ठ व्यक्ती कुटुंबप्रमुख म्हणून नात्यातील गुंता सोडवण्याचे काम करतात.
या कार्यक्रमाला कुटुंब न्यायालय बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड़ परेश देसाई, न्यायालय व्यवस्थापक पी.सी. मथापती, प्रमुख न्यायाधीश मंगला मिलिंद ठाकरे, कुटुंब न्यायालयातील सर्व न्यायाधीश, विवाह समुपदेशक, वकील, कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. तसेच जमलेल्या प्रत्येक जोडप्याचे रेखाचित्र काढण्यासाठी एल.एक्स. रहेजा स्कूल आॅफ आर्टमधील विद्यार्थी होते. यात ओम्कार मिसळे, विनायक खेराटकर, कृतिका गुप्ता, वैभव जगताप, ऋषी पणीकर आणि मल्लेका राऊत यांनी रेखाटलेली जोडप्यांची रेखाचित्रे ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’ म्हणून जोडप्यांना देण्यात आली.

ख्रिश्चन-सिंधी जोडप्याचा संदेश
अनेक अडचणींना तोंड देत आंतरधर्मीय विवाह करणारे साजन-ओमेन या वेळी म्हणाले, दक्षिण भारतातून मुंबईत शिकण्यासाठी मी आलेलो, तेव्हा माझे प्रेम सिंधी समाजाच्या मुलीवर झाले. मी ख्रिश्चन असल्यामुळे दोघांच्या घरातून टोकाचा नकार होता. आमच्यामध्ये कोणतेही साम्य नव्हते. तसेच दोघांच्या घरामध्ये कोणीही आंतरधर्मीय लग्न केले नव्हते. त्यामुळे दोघांच्या पालकांनी आम्हाला घरातून बाहेर काढले. प्रत्येक क्षण परीक्षेचा काळ होता. कोणाकडून कधी पैसे नाही घेतले. आता आम्हाला दोन मुले असून एक २३ वर्षांचा आणि एक २१ वर्षांचा आहे. काही कालावधीनंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला मान्यता दिली. कधी एकमेकांशी भांडणे झाली तर लगेच ती सोडवली जात असत, त्यामुळे भांडणे झाली असे कोणाला कधी सांगितले नाही. जेव्हापासून एकत्र आलो आहोत तेव्हापासून प्रत्येक गोष्टीत आमच्या दोघांचा समावेश आहे. २६ वर्षांनतर ... माझ्या कुटुंबातील लोक आता माझ्या पत्नीचा प्रत्येक गोष्टीसाठी सल्ला घेतात. आधी जिला विरोध करीत होते तिलाच आता सर्वांनी आपलेसे केले आहे. नवीन जोडप्यांना संदेश देताना सांगेन की, लग्न करीत असाल तर स्वत:मधील अहंकार बाजूला ठेवा. कधी कोणतीही गरज पडली तर आपल्या जोडीदाराला मदत करणे गरजेचे आहे.क्षुल्लक कारणामुळे घटस्फोटाचा निर्णय घेऊ नका.

एकमेकांना समजून घ्या, विचार करा, विश्वास ठेवा!
घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात येणाºया प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कारणे असतात. छोटीमोठी भांडणे, क्षुल्लक वाद, घरातील नातेवाइकांचा त्रास यामुळे घटस्फोट घेण्यासाठी येतात. या वेळी दोघांचे मत समजून घेऊन सुरुवातीला त्यांना मार्गदर्शन केले जाते. विवाह समुपदेशक, न्यायाधीश तसेच वकीलदेखील मार्गदर्शन करतात. प्रत्येकाची वेगवेगळी अडचण असल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवर समजावले जाते. प्रत्येकाने सहकार्य, सहवासाची भावना जपणे गरजेचे आहे. सामोपचाराने घटस्फोटाचा निर्णय बदलणे आवश्यक आहे. काही वेळा दोन्ही पक्ष ऐकायला तयार नसतात, तेव्हा त्यांच्यावर कोणताही दबाव न आणता पुढची प्रक्रिया पार करण्यात येते. यात मुलांचे प्रश्न, संपत्तीचा प्रश्न, मुलांची पोटगी यावर विचारपूर्वक निर्णय घेण्यात येतो. काही वेळेला समझोता करण्यासाठी अंदाजे ६ महिने किंवा १ वर्षाचा कालावधी देण्यात येतो. एक खटला अंदाजे २ ते ३ वर्षे न्यायालयात चालू शकतो. नवीन जोडप्यांना संदेश देताना हेच सांगणे आहे की, समोरच्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून स्वीकारा, एकमेकांना समजून घ्या, विचार करा, विश्वास ठेवा, सहकार्याची भूमिका बाळगा. - वीणा आठवले, प्रमुख विवाह समुपदेशक, कुटुंब न्यायालय

मुलाकडे पाहून निर्णय बदलला
स्वत:मधील गर्व आणि एकमेकांमधील मतभेद असल्याने तडकाफडकी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटुंब न्यायालयात अनेक वर्षांपासून घटस्फोट मिळविण्यासाठी फेºया मारत होतो. सुरुवातीला विवाहसमुपदेशन करण्यात आले; पण नंतर घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एकमेकांशी फोनवर बोलणे सुरू होते. तसेच सात वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याकडे बघून आमचे मनपरिवर्तन झाले; आणि आम्ही घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला. मी सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत आहेत; तर दीपाली डॉक्टर आहे. मुलाकडे बघून आणि विचारात बदल करून नव्याने नात्याची सुरुवात केली आहे. नवीन जोडप्यांना हाच संदेश आहे की, स्वत:मध्ये बदल करा. समाजात, घरात वावरताना आधी आपण कुठे चुकतो आहोत याचा विचार करा. भांडणे झाली तरी वरिष्ठांकडून समजूत काढून घ्या, कोर्टाची पायरी चढू नका.
- तुषार गावडे आणि दीपाली गावडे (नावात बदल

पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते
घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता नवीन नाते तयार झालेले आहे. असे वाटते की पुनर्जन्म झालेला आहे. सुशिक्षित घराण्यातील मुलगी असल्याकारणाने असे पाऊल उचलणार असे कोणाला वाटले नाही. त्यामुळे सर्वांकडून टोमणे, सल्ले ऐकवले जात होते. त्यामुळे आता घटस्फोट घेण्याचा निर्णय मागे घेतलेला आहे. आता पुन्हा नव्याने संसार मांडणार आहे.
- श्री व सौ. दूधसाखरे
(नावात बदल केलेला आहे.)

विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे
माझ्या (सिव्हेटस) चुकीमुळे दोन वर्षे लांब राहिलो. घटस्फोट घेण्याच्या शेवटच्या क्षणाला निर्णयात बदल केला. पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला असून तो अंमलात आणला जात आहे. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना एकच संधी असते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. घटस्फोट होताना दोन व्यक्ती तुटल्या जात नसून दोन कुटुंबे विभक्त होतात.
- सिव्हेटस आणि श्वेता

स्वत:चे कर्तव्य पूर्ण करा
एक आदर्श जोडपे म्हणून बोलावण्यात आले आहे. पण आम्ही तेवढे काही मोठे नाही. आम्ही दोघे १६ ते १७ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच भेटलो. दोघांचा स्वभाव हा वेगवेगळा त्यामुळे एकमेकांचे लवकर जमत नसे. मुमताजकडून जबाबदारी कशी स्वीकारायची, कशी पेलायची हे शिकलो. आमच्या लहान मुलीच्या सल्लाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कधीही फक्त अधिकाºयाची भूमिका बाळगू नये. आपली स्वत:ची कर्तव्ये निभावणेदेखील गरजेचे आहे. घरची कामे एकत्र करीत असतो. घटस्फोटामध्ये धर्माचे कारण आड येता कामा नये. आपले व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. घरामधील संस्कृती, भाषा, खाणे-पिणे, राहणीमान सर्वकाही वेगवेगळे असले तरी नाते बांधता येते आणि टिकविताही येते.
- राहुल गवारे आणि मुमताज शेख

एकमेकांना वेळ देणे आवश्यक
आपले आपल्यावर रुसतात तेव्हा पाणावलेले डोळे दिसतात. एक वर्षाचा दुरावा होता. एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दुरावा सहन झाला नाही. नवीन जोडप्यांना असाच संदेश देईल की, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना दूर ठेवता कामा नये. एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. माफ करण्याची भूमिका बाळगली पाहिजे.
- किशन व नैना,(नावात बदल केलेला आहे.)

Web Title: Family Court "Connecting Not to be Broken"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई