विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 08:51 PM2019-04-24T20:51:57+5:302019-04-24T20:53:32+5:30

देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते याची जाणीव नरेंद्र मोदींनी करुन दिली आहे.

Election of national security with development, vote for the country - Chief Minister | विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा - मुख्यमंत्री

विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक, देशासाठी मतदान करा - मुख्यमंत्री

Next

मुंबई : देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते याची जाणीव नरेंद्र मोदींनी करुन दिली आहे. उरी व पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोदींनी धडा शिकवला आहे. मात्र याचवेळी कॉंग्रेस मात्र जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक केवळ विकासाची नसून विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षिततेची आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देशासाठी मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर मध्य मतदारसंघातील भाजपा उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथील शिवाजी मैदानामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

पराभव झाल्यानंतर ज्या उमेदवाराने मोबाईल, कार्यालय बंद केले त्याचे डिपॉजिट जप्त करुन महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कॉंग्रेसवर व राहुल गांधीवर सडकून टीका केली.  दोन हजार आठच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला असो की पाकची इतर आगळीक असो तत्कालीन पंतप्रधान कणखर नसल्याने योग्य प्रत्युत्तर देण्यात आले नाही.  मोदींनी मात्र लष्कराला निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले व पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.  मुंबईत सध्या प्रति माणसी सव्वा लाख रुपये विविध प्रकल्प उभारणीवर खर्च होत आहेत. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या पाव पट देखील खर्च केला नाही. मुंबईत सुरु असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना धक्के खावे लागणार नाहीत. मुंबईचे चित्र बदलण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला. 

मुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यात येणार असून मेट्रो, रेल्वे, मोनो, बस व जलप्रवास एकाच तिकीटावर करता येईल असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना आचारसंहितेनंतर व पावसाळ्यापूर्वी चाव्या देण्याची ग्वाही त्यांनी दिली. मुंबईचा विकास पुढे नेण्यासाठी सेना भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कॉंग्रेसला पराभवाची खात्री वाटत असल्याने ते काहीही आश्वासन देत आहेत.  राहुल गांधीच्या पणजोबा, आजी, वडिल व आईला सत्तेची संधी दिली मात्र जनतेची गरीबी हटली नाही.  केवळ त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गरीबी हटल्याची टीका त्यांनी केली. कॉंग्रेस नेत्यांना झोपेत देखील मोदी दिसतात. त्यांचे जाहीरनामे भाषणे सर्व उधारीचा मामला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कॉंग्रेसने साठ वर्षात अनाचार, अत्याचार, भ्रष्ट्राचार केला तर मोदींनी पाच वर्षात प्रामाणिक, पारदर्शी कारभार केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

पूनम महाजन म्हणाल्या,  मी पाच वर्षांत केलेल्या विकास कामांवर निवडणूक लढवत आहे. वडिलांच्या नावाची ढाल नव्हे तर विकास कामांची तलवार घेऊन लढाई लढत आहे. देशाचे भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे याचा विचार करुन मुंबईकरांनी मतदान करावे. विमानतळ परिसरातील ऐंशी हजार झोपडीधारकांना  मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने घरांच्या चाव्या दिल्या. माजी खासदाराचा दहा वर्षातील विकासाचा अनुशेष भरुन काढल्याचा दावा  महाजन यांनी केला. पब्लिक पॉलिटिशिएन पार्टनरशीप (पीपीपी)  या तत्वावर पाच वर्षे विकासकामे केली यापुढेही असेच काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, लीलाधर डाके, आमदार आशिष शेलार, मंगेश कुडाळकर , पराग अळवणी, संजय पोतनीस, आर. एन. सिंह, सुधाकर देशमुख, तृप्ती सावंत, अविनाश महातेकर उपस्थित होते.

Web Title: Election of national security with development, vote for the country - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.