राज्यभरात स्वाइन फ्लूचे १०७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:41 AM2019-04-18T06:41:50+5:302019-04-18T06:41:57+5:30

वातावरणातील बदलांमुळे राज्यभरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे.

107 victims of swine flu in the state | राज्यभरात स्वाइन फ्लूचे १०७ बळी

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १०७ बळी

googlenewsNext

मुंबई : वातावरणातील बदलांमुळे राज्यभरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यांच्या काळात स्वाइन फ्लूचे तब्बल १०७ बळी गेले आहेत. तर १,३०१ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. याखेरीज, व्हेंटिलेटरवर सात रुग्ण असून त्यातील पुणे महापालिकेच्या हद्दीतील सहा आहेत, तर लातूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. स्वाइनचे नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजे २४ बळी गेले असून मुंबईतील दोन रुग्णांचाही मृत्यू ओढावला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध रुग्णालयांत २२९ रुग्ण स्वाइनवर उपचार घेत आहेत. तर १ जानेवारी ते १६ एप्रिल या काळात ८ लाख ५९ हजार १९८ रुग्णांना आरोग्य विभागाने तपासले आहे. तसेच आॅसेलटॅमिवीर हे औषध दिलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या १५ हजार ४० एवढी आहे. थंडीचे वातावरण स्वाइन फ्लू विषाणूच्या प्रसारासाठी पोषक असते, असा सर्वसाधारण समज आहे. यंदा थंडी संपून उन्हाळा सुरू झाला तरी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत.
राज्यात मुक्कामाला असणाऱ्या स्वाइन फ्लूच्या भीषण स्थितीविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी रात्रीचे, सकाळचे तापमान आणि दिवसभराचे तापमान यात तफावत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूबाधित रुग्णांची संख्या अद्याप शून्यावर आलेली नाही. स्वाइन फ्लूसदृश्य लक्षणे दिसणाºया रुग्णांचे स्थलांतर हादेखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची प्रक्रिया सुरूच राहाते. हे टाळण्यासाठी विषाणूजन्य आजाराची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने औषधोपचार घेणे तसेच संपूर्ण विश्रांती घेणे गरजेचे आहे.
>विषम हवामानाचा परिणाम
स्वाइन फ्लूचा विषाणू पसरण्यास सर्वाधिक पोषक काळ थंडीचा आहे हा सर्वसाधारण समज आहे. मात्र दिवसा कडक ऊन, पहाटे आणि रात्री गारठा असे विषम हवामानाचा परिणाम म्हणूनदेखील स्वाइन फ्लूच्या वेगवान वाढीसाठी कारणीभूत ठरते.
- डॉ. प्रदीप आवटे, सर्वेक्षण अधिकारी,
सार्वजनिक आरोग्य विभाग
>स्वाइन फ्लूच्या मृत्यूची आकडेवारी
जिल्हा/मनपा मृत्यू
नाशिक २४
नागपूर १६
अहमदनगर १२
पुणे मनपा ८
कोल्हापूर, मुंबई मनपा प्रत्येकी ५
पुणे ग्रामीण, अमरावती प्रत्येकी ४
जळगाव, पिंपरी-चिंचवड मनपा प्रत्येकी ३
औरंगाबाद, सातारा, कल्याण,
बुलडाणा, अकोला, पालघर, ठाणे प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, भंडारा, सोलापूर, वसई-विरार,
बीड, चंद्रपूर मनपा, यवतमाळ, धुळे, रायगड प्रत्येकी १

Web Title: 107 victims of swine flu in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.