अहमदाबाद : गेल्या वर्षीपर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांना घसघशीत परतावा देणाऱ्या कापसाने यंदा अनेक उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली आहे. गुजरातमधील सौराष्ट्रात विदर्भातील परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती वर्तविली जात आहे.
पावसाच्या दृष्टीने दोन्ही भागांत एकसारखीच परिस्थिती आहे. दोन्ही प्रदेशात अनियमित व अवकाळी पाऊस पडतो. यामुळे योग्य सिंचन सुविधांअभावी शेतकरी पूर्णत: पावसावरच अवलंबून आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, सौराष्ट्र भागात आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कापसाचा हमीभाव वाढवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सध्या कापसाला ८१० रुपये प्रति २० किलोसाठी हमीभाव दिला जात आहे. या भावावर शेतकऱ्यांना खूप नुकसान सोसावे लागत आहे.
शेतकरी मोर्चे काढत आहेत, सरकारला निवेदन देत आहेत आणि कापूस जाळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील सत्ताधारी भाजपाशी संबंधित भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाची धग सौराष्ट्रातून राज्याच्या अन्य भागांतही पसरत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाद्वारे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. कृषी विभागाचे उपसंचालक एच. बाबरिया यांनी सांगितले की, चांगल्या परताव्यामुळे गेल्या दशकात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस शेतीकडे आकर्षित झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, २००१ साली राज्यात १६ लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली होते, आता २०१४ मध्ये ते वाढून ३० लाख हेक्टर झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यंदा राज्यात कापूस उत्पादन १.३० लाख गाठी एवढे राहील. (वृत्तसंस्था)
शेतक-यांसाठी कापूस ठरतेय धोक्याचे पीक
गेल्या वर्षीपर्यंत गुजरातमधील शेतकऱ्यांना घसघशीत परतावा देणाऱ्या कापसाने यंदा अनेक उत्पादकांच्या अडचणीत भर टाकली आहे
By admin | Published: December 23, 2014 12:25 AM2014-12-23T00:25:44+5:302014-12-23T00:25:44+5:30