शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, भाजपचा विधिमंडळ पायरीवर ठिय्या

By महेश गलांडे | Published: March 3, 2021 01:31 PM2021-03-03T13:31:05+5:302021-03-03T13:39:30+5:30

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवनात करण्यात‍ आला.

सर्व देश, राज्य लॉकडाऊन असताना शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून केली जात होती.

शेतकऱ्यांनी लॉकडाऊन केले असते, तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहाबाहेर ठिय्या केला.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी यासाठी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भाजपा नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध ठिय्या केला. यावेळी, फलकबाजीही करण्यात आली.

फेब्रुवारी महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी फळबागाही उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे, शेतकरी संकटात सापडला आहे.

संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून दाद देण्यात येत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी भाजपाने विधिमंडळाच्या पायरीवर ठिय्या केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य असून, नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाच्या शुभारंभावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.