वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिवळ्या पटट्यांचा उतारा
By Admin | Updated: June 18, 2015 00:38 IST2015-06-18T00:38:40+5:302015-06-18T00:38:40+5:30
टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या रांगाच रांगा दिसल्यास सेवा योग्य प्रकारे देत नसल्याच्या कारणास्तव संबधित टोलवसुली कंपनीवर कारवाई

वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिवळ्या पटट्यांचा उतारा
ठाणे : टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या रांगाच रांगा दिसल्यास सेवा योग्य प्रकारे देत नसल्याच्या कारणास्तव संबधित टोलवसुली कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिवळ्या पट्ट्यांचा उपायही त्यांनी सुचविला आहे. टोलवसुली कर्मचाऱ्यांमुळे वाहतूककोंडी झाल्यास केंद्रापासून या पट्ट्यांपर्यंत सलग १० वाहने उभी असल्यास त्यांना टोलवसुलीतून सूट देण्याचे आदेश त्यांनी दिले.
टोलनाके वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी त्यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
मुंबईत येणाऱ्या अथवा बाहेर जाणाऱ्या गाड्यांमध्ये खासगी लहान चारचाकी गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये चाकरमान्यांपासून कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेकांचा प्रवास होत असतो. परंतु, टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीमुळे इंधन आणि वेळेच्या नासाडीमुळे बहुसंख्य वाहनचालक हैराण झाले आहेत. अशा वेळी टोलमुक्तीसाठी प्रयत्न करीत असतानाच मुंबईच्या एण्ट्री पॉइंटच्या टोलनाक्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी त्यांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीला टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. टोलनाक्यावर ठराविक अंतरावर पिवळे पट्टे मारण्याची सूचना त्यांनी केली.
टोलवसुलीचा वेग न वाढविल्यास सुमारे १० गाड्या एखाद्या रांगेत उभ्या राहिल्यानंतर अकरावी गाडी पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर जाणार आहे. अशा प्रकारे गाड्यांची संख्या वाढल्यास पिवळ्या पट्ट्यांच्या अलीकडील वाहनांना टोलमाफी देऊन त्यासह पुढील गाड्यांची वाहतूककोंडीतून सुटका करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.