- मनोहर कुंभेजकरमुंबई - जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने व पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कार्यकाळाला ११ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय व मुंबई महानगरपालिका आर मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी बोरीवलीत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२०२१ पासून केंद्रीय पर्यावरण विभागाने एकल प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यासाठी अधिसूचना काढली असली तरी जनसामान्यात अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही.तसेच ओला व सुखा कचरा वर्गीकरण, वेस्ट इलेट्रिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू,मेटल,काचेच्या बाटल्या पुन्हा उपयोगात कशा पद्धतीने आणल्या जातात, या संदर्भात माहिती व जनजागृती जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनपाच्या घन कचरा विभाग तर्फे देण्यात आली. या कार्यक्रमात जमलेल्या नागरिकांनी आमदारांसमवेत स्वच्छतेची शपथ प्रतिज्ञा घेतली.
आमदार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क सेवालय कार्यालयाजवळ मोक्ष प्लाझासमोर बोरिवली पश्चिम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदूषणाला आळा घालून प्लास्टिकचा वापर टाळावा, ओला कचरा सुखा कचरा इ वेस्टज घातक वस्तूंचे वर्गीकरण कसे करावे या संदर्भात माहिती या वेळी देण्यात आली.
चिकूवाडी येथे स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात माजी खासदार गोपाळ शेट्टी व आमदार संजय उपाध्याय यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.
स्वच्छ बोरिवली सुंदर बोरिवली हा नारा देत आमदार संजय उपाध्याय यांनी प्लास्टिक मुक्त बोरिवली करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचाच भाग म्हणून त्यांच्या कार्यालयात प्लास्टिक घेऊन येण्यास त्यांनी पूर्णपणे बंदी घातली असून आजपासूनच याचा त्यांनी शुभारंभ केला आहे. नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक तसेच मुंबई महानगरपालिकेतर्फे संदीप म्हाळुंगकर ,दिनेश पाटील, माधव गायकवाड ,अजय शिंदे, ऋतुजा धामणकर सतीश शिरसाट व महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.