प्रवाशांपेक्षा कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रवास
By Admin | Updated: March 6, 2015 23:53 IST2015-03-06T23:53:48+5:302015-03-06T23:53:48+5:30
प्रवाशांपेक्षा कर्मचारीच बससेवेचा सर्वाधिक फायदा घेत असल्याचे कारण देत कळंबोली - वडाळा ही बससेवा पूर्ववत करण्यास बेस्ट व्यवस्थापनानाने नकार दिला आहे.

प्रवाशांपेक्षा कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक प्रवास
पनवेल : प्रवाशांपेक्षा कर्मचारीच बससेवेचा सर्वाधिक फायदा घेत असल्याचे कारण देत कळंबोली - वडाळा ही बससेवा पूर्ववत करण्यास बेस्ट व्यवस्थापनानाने नकार दिला आहे. जलद आणि वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यास असर्मथता दाखवणा-या बेस्ट व्यवस्थापनाच्या या कांगाव्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खारघर या वसाहतींतून नोकरी-व्यवसायानिमित्त चाकरमानी आणि व्यावसायिक मुंबई तसेच उपनगरात दररोज जातात. उपनगरीय रेल्वेसेवेबरोबर बसनेही कित्येक जण प्रवास करतात. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या मार्गावरील बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी बृहन्मुंबई परिवहन उपक्र माच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून बंद केलेल्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली, मात्र बेस्टने ही सेवा सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शविली.
कळंबोली ते वडाळा हा मार्ग लांब पल्ल्याचा आहे. त्यांचा प्रवासखर्च मोठ्या प्रमाणावर होता. या व्यतिरिक्त देवनार व शिवाजीनगर आगारांमध्ये बसगाड्यांची क्षमता पूर्ण झाल्याने येथून अतिरिक्त बसमार्गाचे प्रवर्तन शक्य नसल्याचे बेस्टने आत्माराम पाटील यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. त्याचबरोबर या बसमध्ये प्रवाशांपेक्षा उपक्र माचे कर्मचारीच मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असल्याचे कारण बेस्टने पुढे केले आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याने ही सेवा सुरू करणे व्यवहार्य ठरत नसल्याचे बेस्टचे मुख्य व्यवस्थापक प. ग. साखळकर यांनी लेखी कळविले आहे. (प्रतिनिधी)
तासाभरात मुंबई गाठणे शक्य
१ पाच वर्षांपूर्वी प्रवाशांच्या मागणीनुसार कळंबोली ते वडाळा
‘सी -५२’ क्र मांकाची बससेवा बेस्टने सुरू केली होती. प्रत्येक वीस मिनिटांनी या बसेस धावत होत्या. सकाळी लवकर बस असल्याने चाकरमान्यांना त्याचा फायदा होत होता. जलद बससेवेमुळे तासाभरात मुंबई किंवा कळंबोली गाठणे शक्य होत होते.
२त्याचबरोबर या मार्गावर ५०३ क्र मांकाची वातानुकूलित बसही सुरू होती, मात्र या दोन्ही बसेसच्या फेऱ्या बेस्टने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नोकरदार चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. परिणामी, ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.