नव्या जलवाहिन्यांचे काम रखडणार!
By Admin | Updated: June 18, 2015 00:48 IST2015-06-18T00:48:06+5:302015-06-18T00:48:06+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते, शिवाय वारंवार शटडाऊनही घ्यावे लागते.

नव्या जलवाहिन्यांचे काम रखडणार!
कळंबोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुनाट जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते, शिवाय वारंवार शटडाऊनही घ्यावे लागते. यावर तोडगा काढण्याकरिता जलवाहिन्या बदलण्यासाठी सिडको आणि एमएमआरडीएने सकारात्मकता दर्शवली खरी, मात्र ‘नैना’चे नाव पुढे करून एमएमआरडीएने हात आखडता घेतला. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम रखडण्याची शक्यता आहे.
भोकरपाडा जलशुद्धी केंद्रापासून आलेल्या एमजेपीच्या जलवाहिन्या अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजल्या आहेत. सुमारे तीस किमी अंतरावर असलेल्या या जलवाहिन्यांलगत झोपडपट्टी असल्याने मुद्दाम या वाहिन्या फोडण्याचे प्रकारही होत आहेत. आसूडगाव, भिंगारी, पोदी, नवीन पनवेल, करंजाडे, वडघर बंबईचा पाडा या ठिकाणी वारंवार जलवाहिनी तोडली जाते.
सिडको आणि एमएमआरडीएने याकरिता निधी देण्याचे मान्य केले होते. मात्र हा परिसर नैना प्रकल्पांतर्गत येत असल्याचे सांगत जलवाहिन्यांचा खर्च सिडकोनेच करावा, अशी भूमिका एमएमआरडीएने घेतली आहे.
नवीन जलवाहिन्यांसाठी सिडको व एमएमआरडीएकडे निधीकरिता प्रस्ताव पाठवला असून सिडकोने मंजुरी दिली आहे. मात्र एमएमआरडीएने निधी देण्यास नकारात्मक भूमिका घेतली आहे. आमचा पाठपुरावा सुरू असून निधी मिळाल्यानंतर निविदा पद्धतीने एजन्सी नेमून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
- एस. के. दसरे,
उपअभियंता, एमजेपी