Join us  

स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी ९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल घेणार - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 1:12 PM

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मत्री उदय सावंत यांनी यावेळी मान्य केले.

मुंबई : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याबाबत ९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल जाणून घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याशिवाय, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात दोन महिन्यात स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणाही मंत्री सामंत यांनी यावेळी केली. 

तब्बल ८०० महाविद्यालये आणि आठ लाख विद्यार्थीसंख्येमुळे

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर प्रचंड ताण आहे. तसेच कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी अंतरामुळे मुंबई विद्यापीठ गैरसोयीचे असल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याची मागणी शिवसेना सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. डावखरे यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली. तर, या लक्षवेधी सुचनेच्या चर्चे दरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी मात्र कोकणातील जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली. मुंबई विद्यापीठाचे नाव मोठे असल्याने याच विद्यापीठाशी संलग्न राहण्याची भूमिका लोकांनी मांडल्याचे या सदस्यांनी सभागृहात सांगितले.

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मत्री उदय सावंत यांनी यावेळी मान्य केले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापण्याची मागणी केली आहे. तर, रायगडवासीयांसाठी मुंबई सोयीचे असल्याने त्यांना मुंबई विद्यापीठातच राहायचे आहे. यावर, राजकारण करण्याची आवश्यकता नाही. स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला तरी त्यात रायगडचा समावेश नसेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र कोकण विद्यापीठासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील काही महाविद्यालयांनी कोकणाला मुंबई  विद्यापीठाशीच संलग्न ठेवावे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे दोन वेगळे मतप्रवाह लक्षात घेता यासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. यात संस्थाचालक आणि प्राचार्यांचा समावेश असेल. तसेच विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करूनच स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ९० दिवसांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जाईल. विद्यार्थी केंद्रस्थानी मानूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिंधुदुर्गात विद्यापीठाचे उपकेंद्र 

यावेळी उपकेंद्र सक्षमीकरणाची मागणी सदस्यांनी केली. यावर, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि ठाणे उपकेंद्रांना सक्षम केले जाईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपकेंद्र स्थापन करून येत्या दोन महिन्यात सर्व उपकेंद्रांवर संचालक नेमण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. 

टॅग्स :उदय सामंतमुंबई विद्यापीठ