मुंबई - अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभावित भागातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांत १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे. यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआरडीएकडून नवी मुंबईत सीबीडी बेलापूर भागात नवे नगर विकास प्राधिकरणासाठी (एनटीडीए) १० हजार ते १२ हजार चौरस फूट जागेवर कार्यालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जागेची शोधाशोध एमएमआरडीएने सुरू केली आहे.
अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी एमएमआरडीएची नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील ८० गावे, खोपटा नवनगर क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई महानगर प्रादेशिक योजना क्षेत्रातील २ गावे आणि रायगड प्रादेशिक योजना क्षेत्रातील ९ गावे, अशी एकूण १२४ गावांचा समावेश केला आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे शहर वसविणारअटल सेतू प्रभावित क्षेत्रातील ३२३.४४ चौरस किमी क्षेत्रातील गावांचा विकास साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे शहर वसविले जाणार आहे. हे नव नगर ३२ हजार ३०० हेक्टर क्षेत्रफळावर उभे राहणार आहे. या नव्या शहरातील ६२ टक्के जागा ओपन स्पेसेस असतील.
सध्या बीकेसीतील मुख्यालयातून काम सुरूसध्या तिसऱ्या मुंबईचे काम एमएमआरडीएच्या बीकेसीतील मुख्यालयातूनच सुरू आहे. मात्र, भविष्यात सीबीडी बेलापूर परिसरात सुसज्ज कार्यालय थाटले जाणार आहे.यासाठी जागेची पाहणी एमएमआरडीएने सुरू केली आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.