Join us  

अवयवदानाची व्यापक जनजागृती आवश्यक - श्रीकांत आपटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 5:11 PM

मुंबई विद्यापीठाचा अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार

मुंबई : देशासह राज्यात अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतिक्षायादी खूप मोठी आहे. काही रूग्ण उपचाराने काही दिवस जगू शकतात तर काहीना तातडीने अवयव प्रत्यारोपण करणे गरजेचे असते, मात्र अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, ही भीषण आणि दाहक परिस्थिती बदलण्यासाठी अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र शासनाच्या अवयव प्रत्यारोपण समीतीचे राज्यपाल नियुक्त सदस्य श्रीकांत आपटे यांनी व्यक्त केले. १३ ऑगस्ट जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.

नुकतेच अवयवदान सप्ताहाच्या निमित्ताने राज्यपालांनी विद्यापीठांना जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, तर प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. जनजागृतीच्या अभावामुळे अवयव उपलब्ध होत नाही. त्वचादान, नेत्रदान, संपूर्ण देहदान अशा वर्गवारीतून अवयवदान करता येते. त्वचादानाने जळीत रुग्णांना जीवनदान मिळते तर नेत्रदानामुळे एखाद्याला जग नव्याने पाहता येते. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा असेही श्रीकांत आपटे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करुन त्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

अवयवदानासाठी जनजागृती करुन एक मोठी व्यापक चळवळ तयार करण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध असून एक मिशन म्हणून याचा अंगीकार करून विद्यापीठ वाटचाल करणार असून  अवयव दानाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यापीठाममार्फत वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.  - सुहास पेडणेकर, कुलगुरू मुंबई विद्यापीठ 

टॅग्स :अवयव दानआरोग्यमुंबई विद्यापीठमुंबई