मुंबई - लोकलच्या तिकिटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे रेल्वे प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत केले असले तरी गर्दीचे मूळ कारण सरकारने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपघाताचे मूळ कारण गर्दी असून, गर्दीचे मूळ कारण मेल, एक्सप्रेसला देण्यात येणारे प्राधान्य आहे. त्यामुळे लोकलला लेटमार्क लागून गर्दीत भर पडत जाते. अपघाताची शक्यता वाढते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई म्हणाले, मुंबई रेल्वेचा अभ्यास नसल्याने दिल्लीश्वरांनी दिलेले हे अजून एक आश्वासन आहे. रेल्वे अपघातांचे मूळ कारण अती गर्दी आहे. एक्सप्रेसला प्राधान्य दिल्याने लोकल उशिरा धावतात. एसी ट्रेन हा उपाय नाही. ते जास्त खर्चीक असल्याने समस्या वाढतील.कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर म्हणाले, लोकलच्या भाड्यात ए.सी. लोकलचे ऑटोमॅटिक दरवाजे प्रवाशांना कसे सामावून घेतील ? यावर शासनाने धोरण स्पष्ट करावे.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले की, मुंबई लोकलचा प्रवास जगात सर्वांत स्वस्त आहे. एवढ्या तुटपुंज्या भाड्यात एसी सेवा देणे शक्य वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणजे सखोल विचार केला असणारच. परंतु एसी लोकलमध्ये सर्वांना मुभा दिल्यास गर्दीचे नियोजन कसे करणार? ते कळत नाही. मेट्रोप्रमाणे केवळ तिकीट धारकच आत येऊ शकतील, अशी सोय सर्व रेल्वे स्थानकांवर करणे अत्यावश्यक आहे.महाराष्ट्र राज्याचे मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या म्हणण्यानुसार, जर सर्वसामान्य भाड्यात एसी प्रवास देत असाल, तर त्यासाठी गर्दीचा काळ, दरवाजे उघडण्याचा कालावधी आणि प्रवाशांची व्यवहार्य संख्या यांचा अभ्यास करावा लागेल. ज्या स्थानकांवर अत्याधिक गर्दी होते, तेथून अधिक लोकल सोडल्या गेल्या पाहिजेत.