आठवडा बाजारांना आशीर्वाद कुणाचा?
By Admin | Updated: January 10, 2015 22:44 IST2015-01-10T22:44:31+5:302015-01-10T22:44:31+5:30
सर्वसामान्यांचा ओळखला जाणारा आठवडाबाजार गेल्या १४ वर्षांपासून ठाण्यातील विविध भागांत सुरू आहे.

आठवडा बाजारांना आशीर्वाद कुणाचा?
अजित मांडके ल्ल ठाणे
सर्वसामान्यांचा ओळखला जाणारा आठवडाबाजार गेल्या १४ वर्षांपासून ठाण्यातील विविध भागांत सुरू आहे. येथे हव्या त्या वस्तू अवघ्या पाच रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होतात. या बाजारातून स्थानिक गावगुंड हे प्रत्येक फेरीवाल्याकडून १० रुपये हप्ता वसूल करीत असल्याच्या तक्रारी असून सोनसाखळीचोरी, हाणामारी, रहदारीला होत असलेला अडथळा, महिलांची छेडछाड आदी प्रकारांमुळे हा बाजार बंद करण्याचा ठराव २५ मार्च २०१३ रोजी करण्यात आला होता. परंतु, आज जवळजवळ वर्ष होत आले असतानादेखील हा आठवडाबाजार सुरूच असल्याने पालिकेने जणू महासभेच्या या ठरावास केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर्स येथे भरणारा आठवडाबाजार हा कळवा-बेलापूर पट्ट्यातील एकेकाळचा सर्वात मोठा बाजार मानला जात होता. ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुंब्रा यासारख्या पट्ट्यातील गरीब कामगार, मजुरांची जत्रा येथे भरत होती. फार पूर्वीपासून या बाजारांचे लोण पसरले होते. गावांमध्ये बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आणि यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना जागा भाड्याने मिळू लागल्या. या कामगारवर्गासाठी कपड्यांपासून गृहोपयोगी वस्तू, भाजीपाला, खाद्य, पेय, भांडी, खेळाच्या वस्तू, स्त्रियांचे विविध प्रकारचे अलंकार आदी वस्तू स्वस्त दरात या बाजारात उपलब्ध झाल्या. त्यामुळेच ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरांतील आठवडाबाजार वेगळे महत्त्व राखून आहेत. मात्र, आठवड्यातील एका दिवसाकरिता भरणारे बाजार स्थानिक गुंडांच्या हप्तेखोरीचे साधन बनू लागले आहेत. या बाजारात पदपथावरील जागांचे दरही ठरू लागले आहेत. मोक्याची जागा मिळवायची असेल तर गल्लीगुंडाला जादा कमाई करून द्यायची आणि पुढे महापालिका, पोलीस यांच्यापर्यंत ही साखळी कायम राहते. ठाण्यातील अरुंद रस्त्यांवर भरणारे हे बाजार शहरातील इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. २००८ च्या सुमारास महापालिकेने याला बंदी घातली होती. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा ते सुरू झाले असून त्याला आता हप्तेखोरांचे कवच लाभले आहे. परंतु, हा बाजार बंद व्हावा म्हणून मागील वर्षी स्थायी समितीच्या बैठकीत तीन ते चार वेळा चर्चा झाली. सर्वपक्षीयांनी यासंदर्भात ठराव करून हे आठवडाबाजार बंद करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. जानेवारीत हा ठराव करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा यासंदर्भातील ठराव २५ मार्च २०१३ च्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. अद्यापही कारवाई न केल्याने आजही हे आठवडाबाजार मोठ्या दिमाखात सुरू आहेत. विशेष म्हणजे याबाबत इतिवृत्तान्ताची वाट न पाहता प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे या ठरावात नमूद केले होते. तरीही अद्यापही या आठवडाबाजारावर कारवाई झालेली नाही.
ठाण्यात भरणारे बाजार
४माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती - मंगळवार - ढोकाळी नाका, बुधवार - आझादनगर, गुरुवार - कासारवडवली, शुक्रवार - पातलीपाडा, शनिवार - मनोरमानगर, सोमवार- मानपाडा.
४वागळे प्रभाग समिती - बुधवार - किसननगर,
४रायलादेवी प्रभाग समिती - मंगळवार - इंदिरानगर
४कळवा प्रभाग समिती - सोमवार - विटावा, मंगळवार - भास्करनगर, बुधवार - कळवा, खारेगाव, घोलाईनगर, शुक्रवार - खारेगाव, रविवार - खारेगाव