Join us  

माझ्याविरोधात एक संपूर्ण टोळी सक्रिय; ए. आर. रेहमान यांचा अत्यंत गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 8:40 PM

माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत; त्यामुळे मला चांगले चित्रपट मिळत नाही; रेहमान यांचा दावा

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) गटबाजी करून एकटं पाडण्यात आल्याचे आरोप झाले. त्यामुळे त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा झाली. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना आता ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान (A R Rahman) यांनी इंडस्ट्रीतील गंभीर वास्तव समोर आणलं आहे. एक गट माझ्याविरोधात अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रेहमान यांनी सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ठरलेल्या दिल बेचाराला संगीत दिलं आहे. हा चित्रपट कालच ऑनलाईन प्रदर्शित झाला.मी चांगले चित्रपट नाकारत नाही. मात्र एक गट गैरसमजातून माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत आहे, असं रेहमान यांनी 'रेडिओ मिर्ची'सोबत साधलेल्या संवादात म्हटलं. मुकेश छाबडा माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना दोन दिवसांत गाणं तयार करून दिलं. 'सर, ए. आर. रेहमान यांच्याकडे जाऊ नका, असं किती तरी जणांनी छाबडा यांना सांगितलं होतं. छाबडा यांच्याकडून मला अनेक गोष्टी समजल्या,' असं रेहमान म्हणाले.मुकेश छाबडा यांनी अनेक गोष्टी सांगितल्यानंतर मला कमी काम का मिळतंय, याचा उलगडा झाला. चांगले चित्रपट मला का मिळत नाहीत, तेदेखील यामुळे समजलं, अशा शब्दांत रेहमान यांनी त्यांच्यासोबत सध्या घडत असलेल्या गोष्टी सांगितल्या. 'मी डार्क चित्रपट करतो. कारण एक संपूर्ण गट माझ्याविरोधात काम करत आहे. यातून माझं नुकसान होत आहे,' असंही रेहमान पुढे म्हणाले.काही लोकांना वाटतं की मी त्यांच्यासोबत काम करावं. पण मला कामच मिळू नये, असं वाटणारीदेखील काही मंडळी आहेत. पण माझा नशिबावर विश्वास आहे. आपल्याला जे काही मिळतं, ते परमेश्वराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं, असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या चित्रपटांवर काम करत आहे. तुम्ही माझ्याकडे येणार असाल, तर तुमचं स्वागतच आहे, असं रेहमान म्हणाले.

टॅग्स :ए. आर. रहमानसुशांत सिंग रजपूत