Join us

धार्मिक हिंसाचारावर चुप्पी कधी तोडणार?, स्वामी अग्निवेश यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 06:18 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा निषेधही नोंदविलेला नाही.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा निषेधही नोंदविलेला नाही. याउलट देशातील वाढती असहिष्णुता आणि धार्मिक हिंसाचारावरही पंतप्रधानांचे मौन कायम आहे. त्यामुळे या घटनांना त्याचे समर्थन आहे का? असा सवाल बंधुआ मुक्ती मोर्चाचे नेते स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.स्वामी अग्निवेश म्हणाले की, विचारवंतांच्या हत्यांच्या निषेध नोंदविणे दूरच. मात्र, या हत्यांवरून आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मोदी समर्थन करत आहेत, ही गंभीर बाब आहे. याचा अर्थ पंतप्रधानांचा या घटनांना पाठिंबा आहे का? की, पंतप्रधानांच्या सूचनेवरूनच ही प्रकरणे घडली आहेत? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. देशात द्वेषाचे राजकारण वाढत असून, हिटलरप्रमाणे जाती, धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. एका विचारवंताला मारून लोक घाबरणार नाहीत. याउलट एका दाभोलकरांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलनचे ३५० युनिट वाढले आहेत. अर्थात, हजारो दाभोलकर तयार झाले आहेत.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकर