Join us  

'जे तुम्हाला शक्य झालं नाही, ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही'

By महेश गलांडे | Published: November 17, 2020 1:32 PM

''बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही...

ठळक मुद्दे''बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही...

मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. बाळासाहेबांच्या आठवणी जागवून शिवसैनिकांनी आणि नेते मंडळींनी सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच, भाजपा नेते आणि नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. 

माजी खासदार नितेश राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून राणे कुटुंबीय आजही बाळासाहेबांना विसरले नाही, असे म्हटलंय. मात्र, त्याचसोबत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. 

''बाळासाहेब आज तुम्ही नाही आहात पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही... स्व. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.'', असे ट्विट निलेश राणे यांनी केलंय. राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचा वाद महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यातून दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबीयांवर शाब्दीक बाण चालवले होते. त्यानंतर, राणे पिता-पुत्रांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, ट्विवरवरुन सातत्याने शिवसेनेवर प्रहार करणाऱ्या निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

मनसेची शिवसेनेवर टीका

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षापूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षात याठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. ही खासगी संपत्ती नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काय झालं? हे जनतेला सांगावे असं आवाहन त्यांनी शिवसेनेला केलं होतं.

शिवसेनेचं उत्तर 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत त्यावर म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेनानिलेश राणे