‘राधे माँ’विरोधातील तक्रारींवर काय कारवाई केली? - हायकोर्ट
By Admin | Updated: August 26, 2015 02:30 IST2015-08-26T02:30:28+5:302015-08-26T02:30:28+5:30
राधे माँविरोधातील तक्रारीवर काय कारवाई झाली याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिले.

‘राधे माँ’विरोधातील तक्रारींवर काय कारवाई केली? - हायकोर्ट
मुंबई : राधे माँविरोधातील तक्रारीवर काय कारवाई झाली याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिले.
या प्रकरणी फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे. राधे माँ नागरिकांची फसवणूक करते. त्यांच्यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या जातात. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार बोरीवली पोलिसांत करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. आता न्यायालयानेच कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात राधे माँ यांच्याकडून अॅड. मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला. ही याचिका तथ्यहिन आहे. प्रसिद्धीसाठी ही याचिका करण्यात आली आहे, असा आरोप अॅड. साठे यांनी केला.
सरकारी वकील संदीप शिंदे यांनी या प्रकरणी ब्रह्मभट्ट यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, चौकशीत तथ्य आढळल्यास राधे माँ यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ आॅगस्टला होणार आहे.