Join us  

"अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण..."; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 7:48 PM

देशातील महर्षी वाल्मीकी भक्तांनी डोळ्यात साठवला असून, महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे.

मुंबई - महर्षी वाल्मीकी यांनी रामायण ग्रंथ लिहून प्रभू श्रीरामाचा आध्यात्मिक इतिहास जगासमोर आणला आणि तो अजरामर केला. हा गौरवपूर्ण इतिहास जगासमोर भावी पिढीला प्रेरणादायी राहावा, यासाठी त्यांच्या नावाने अयोध्या येथील विमानतळ आता ओळखले जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अयोध्या येथील महर्षी वाल्मीकी यांचे नाव असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले. देशातील सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून खंतही व्यक्त केली. 

देशातील महर्षी वाल्मीकी भक्तांनी डोळ्यात साठवला असून, महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी, त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या महाराष्ट्रातील दोन विमानतळांच्या प्रस्तावाची आठवण करुन दिली.  

अयोध्येतील विमानतळाचे 'महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करण्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ह्या विमानतळामुळे प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरूंना अयोध्येला सहज पोहोचता येईल. त्याचप्रमाणे मोपा, गोवा येथील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री मनोहर पर्रीकर ह्यांचा उल्लेख आहे. महोदय, ह्या नावांचे नामकरण स्वागतार्ह असले तरी, अत्यंत नम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्रात मविआ सरकारने २ विमानतळांच्या नामकरणास मान्यता दिली होती आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवली होती. 

१) औरंगाबाद विमानतळाचे 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे नामकरण,

२) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 'श्री दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण आम्ही प्रस्तावित केले होते.

आम्ही हे २ प्रस्ताव अनुक्रमे २०२० आणि २०२२ मध्ये पाठवले असताना, आम्हाला विविध स्तरांवरून सांगण्यात आले की, कोणत्याही व्यक्तींच्या नावावरुन नव्हे तर विमानतळ ज्या शहरांमध्ये आहेत, त्या शहरांवरुन विमानतळांचे नामकरण करण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे हा विलंब होत आहे. भारतातील २ विमानतळांना २ व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत, हे पाहून आम्हाला खरोखर आनंद झाला आहे आणि ह्या २ विमानतळांना लागू होणारे नियम आमच्या राज्यातील महाराष्ट्रातील २ विमानतळांना देखील लागू होतात का हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या २ व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब चिंतेचे कारण वाटते आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून दुःखही होते. त्याचप्रमाणे श्री. दि. बा. पाटील ह्यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की ह्या सुचवलेल्या २ विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी, अशी मागमी उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेज्योतिरादित्य शिंदेअयोध्याविमानतळ