पाच पोस्टमनवर कामोठेचा भार
By Admin | Updated: May 27, 2014 23:45 IST2014-05-27T23:45:05+5:302014-05-27T23:45:05+5:30
कामोठे वसाहतीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत येथील पोस्ट कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे

पाच पोस्टमनवर कामोठेचा भार
कामोठे : कामोठे वसाहतीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत येथील पोस्ट कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या संपूर्ण वसाहतीतील टपाल वितरणाची जबाबदारी फक्त पाचच पोस्टमनच्या खांद्यावर आहे. परिणामी कामात उरक होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कामोठे येथील पोस्ट कार्यालय अतिशय जुने असून जव्हार इंडस्ट्रीजसाठी हे कार्यालय सुरु करण्यात आले होते. इंडस्ट्रीजचा भाग, कामोठे आणि जुईगाव इतकाच परिसर या कार्यालयाच्या अखत्यारीत होता. या भागातील लोकसंख्या मर्यादित असल्याने उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे पडायचे. परंतु सिडकोने काही वर्षांपूर्वी कामोठे नोड साडेबारा टक्क्यांच्या भूखंडावर विकसित केला. सुरुवातीला पायाभूत सुविधा नसल्याने येथील लोकवस्ती कमी होती. परंतु एकूण ४५ सेक्टरचा विकास करत असताना प्राधिकरणाने रस्ते, पाणी, गटारे या पायाभूत सुविधांची निर्मिती केली. पनवेल-सायन महामार्ग आणि उपनगरीय लोहमार्गाच्या लगत असलेल्या वसाहतीत नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. येथील लोकसंख्या दोन लाखांच्या वरती जावून पोहोचली. हा आकडा आणखी वाढण्यास वाव आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा डाक विभागावर परिणाम झाला असला तरी आजही पोस्टातील कामांचा भार कमी झालेला नाही. या नोडमध्ये दररोज सातशेपेक्षा जास्त टपाल येत असल्याची नोंद आहे. त्यांची वर्गवारी करणे, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही मोठी जबाबदारी पोस्टमनवर आहे.