झोपड्यांना १५ वर्षांनंतर मिळणार पाणी
By Admin | Updated: March 11, 2015 00:21 IST2015-03-11T00:21:47+5:302015-03-11T00:21:47+5:30
शहरातील सन २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जवळपास २० हजार

झोपड्यांना १५ वर्षांनंतर मिळणार पाणी
नवी मुंबई : शहरातील सन २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जवळपास २० हजार झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून २०१५ पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ४८ ठिकाणी झोपडपट्टी आहेत. पालिकेने २००१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये ४१८०५ झोपड्या असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये १९०८९ झोपड्या १९९५ पूर्वीच्या असल्याचे निदर्शनास आले होते. उर्वरित २२७१६ झोपड्या या २००१ पर्यंत तयार झालेल्या आहेत. यानंतरच्या १४ वर्षांमध्ये अजून हजारो झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे पालिका १९९५ पर्यंतच्या झोपड्यांना नळजोडणी देते. उर्वरित नागरिकांना सार्वजनिक नळावर पाणी भरावे लागते. दिघा व एमआयडीसीतील अनेक ठिकाणी फुटलेल्या पाइप लाइनमधून पाणी घेतले जाते. काही ठिकाणी कंपन्यांमधून विनंती करून नागरिक पाणी भरत आहेत. यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी झोपडीधारकांना मागणीप्रमाणे नळजोडणी देण्याची मागणी केली होती. शासनाने जानेवारी २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने जुलै २०१४ मध्ये पालिकेस पत्र देऊन या कालावधीपर्यंतच्या झोपडीधारकांना संरक्षण दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाच्या निर्णयामुळे २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये आणला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रस्तावामध्ये उपसूचना मांडली. २०१५ पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याची मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवक बहादूर बिष्ट यांनीही सर्वांना पाणी मिळाले पाहिजे, असा आग्रह धरला. विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनीही जे ठराव मंजूर होतात त्यांची योग्य अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सर्वमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापेमधील नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
नळजोडणी मिळत नसल्यामुळे अनेकांना कंपन्यांमध्ये विनंती करून पाणी घ्यावे लागत होते. आता नागरिकांना हक्काचे पाणी मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तत्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी व आतापर्यंतच्या झोपडीधारकांनाही नळजोडणी देता येईल का, याची पाहणी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)