Join us

'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:38 IST

केईएममध्ये पाणी साचल्याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने दिले होते.

मुंबई : मुसळधार पावसात केईएम रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याच्या प्रकाराची मुंबईउच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती गौरी गोडसे व न्यायमूर्ती सोमसेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील वृत्तांची दखल घेत हे निर्देश दिले. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने व राज्य सरकारने असा प्रकार टाळण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांबाबत पुढील सुनावणीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. केईएममध्ये पाणी साचल्याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने दिले होते.

छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील रुग्णालयातील बाल मृत्यूंच्या प्रश्नासंदर्भात दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यामध्ये न्यायालयाचा मित्र म्हणून नियुक्त केलेल्या अॅड. मोहित खन्ना यांनी केईएम रुग्णालयातील पाणी साचल्याच्या वृत्ताचे कात्रण खंडपीठासमोर सादर करून प्रशासनाला निर्देश देण्याची विनंती केली. 

रुग्णालयात पाणी साचण्याचे प्रकार घडत असतील, तर रुग्णांच्या आरोग्याबाबत काय होईल, अशी चिंता व्यक्त करत खंडपीठाने रुग्णालयात हे प्रकार चालणार नाहीत, त्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. रुग्णालयाजवळ सखल परिसर असल्याने पाणी रुग्णालयात शिरले. भविष्यात उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी रुग्णालयाच्या सहायक अधिष्ठातांकडून माहिती घेऊन न्यायालयाला दिली.

उच्च न्यायालय काय म्हणाले...? 

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन अशी घटना भविष्यात पुन्हा उद्भवू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घ्यावा व त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे. 

सरकारी वकिलांनीही राज्याच्या आरोग्य विभागाकडून याबाबत काय उपाययोजना आखण्यात येणार आहेत, याबाबत माहिती घ्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जून रोजी ठेवण्यात आली आहे. सोमवारी पावसाचे पाणी रुग्णालयाच्या तळमजल्यावर आल्याने गोंधळ उडाला होता. 

टॅग्स :केईएम रुग्णालयउच्च न्यायालयमुंबई