Join us  

मंत्र्यांच्या बंगल्यातूनही पाणी पळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 8:47 PM

दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा फटका आता मंत्र्यांनाही बसू लागला आहे.

मुंबई -  दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा फटका आता मंत्र्यांनाही बसू लागला आहे. फोर्ट येतील मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात आज सकाळी चक्क पाणीच गायब झाले. यामुळे एकाच गोंधळ उडाला. पालिका मुखयलायात फोन खणखणले आणि शेवटी तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेली ही पाणीकपात सोडवण्यासाठी धावपळ सुरू झाली. मात्र ही समस्या दूर होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी राज्य शासनाच्या जल विभागाने केली आहे.फोर्ट, चर्चगेट, कुलाबा या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र पाण्याची कोणतीही तक्रार नाही, पाणीपुरवठा सुरळीत सुरु असल्याचा अजब खुलासा करीत जल अभियंता खात्याने त्यांची तक्रार धुडकावली होती. याबाबत सानप यांनी स्थायी समितीत मुद्दा उचलल्यानंतर जल अभियंता खात्याने बैठक घेऊन पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून मंत्रालयासमोरील १९ शासकीय बंगले आणि नवीन प्रशासकीय इमारतींमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र ही पाणीकपात नसून तांत्रिक अडचणीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. कुलाबा हा भाग टोकाला असल्याने पाणी कमी येण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. तर पाणीपुरवठ्यात कोणताच बदल करण्यात आलेला नाही, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी पवई-वेरावली बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी मोठ्या जलवाहिनीतील पाणीपुरवठा काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत करण्यात आला आहे. दरम्यान, रिकामी जलवाहिनीमधील हवेच्या दाबामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला. 

मंत्र्यांचा रोषाचा शासनाचे अधिकारी करतायेत सामना गेले काही दिवस सुरू असलेल्या पाणी समस्येवर लवकरात लवकर ताेडगा काढण्याची विनंती राज्य शासनाच्या जल विभागाने वारंवार महापालिकेकडे केली. मात्र याबाबत दखल घेतली जात नसल्याने या विभागाच्या अधिका-यांना मंत्र्यांच्या राेषाचा सामना करावा लागत असल्याची नाराजी अधिका-याने पालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिग्गावकर यांच्याकडे केली आहे. टँकरद्वारे करा पाणीपुरवठामंत्र्याच्या बंगल्यातील पाणीप्रश्न जटील हाेत असल्याने ही समस्या लवकरात लवकर साेडवा. अन्यथा ताेडगा निघेपर्यंत दरराेज आठ ते दहा टँकरची व्यवस्था करण्याची सुचना राज्य शासनाच्या अधिका-यांनी महापालिकेला केली आहे.

टॅग्स :पाणी