कोतुर्डे धरणाच्या पाणी पातळीत घट
By Admin | Updated: May 31, 2015 22:29 IST2015-05-31T22:29:09+5:302015-05-31T22:29:09+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर आणि महाड शहरालगत असलेल्या दासगांव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर आणि गांधारपाले या पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले

कोतुर्डे धरणाच्या पाणी पातळीत घट
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर आणि महाड शहरालगत असलेल्या दासगांव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर आणि गांधारपाले या पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. कोतुर्डे धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
महाड तालुक्यातील १४ गावांना कोतुर्डे धरणातून पिण्याचे पाणी मिळते. टंचाई काळात महाड नगरपालिका शहरासाठी धरणाच्या डेड स्टॉकमधील पाणी डिझेल पंपाद्वारे उपसून शहराला पाणी पुरवठा करते. तर गांधारपाले गावच्या हद्दीत गांधारी नदीच्या पात्रातून जॅक वेलद्वारे पाणी उपसा करून नळपाणी पुरवठ्याद्वारे नदी किनाऱ्याची १४ गावे पिण्यासाठी वापर करतात. ही नळपाणीपुरवठा योजना १७ वर्षे जुनी आहे. दासगांव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर आणि गांधारपाले या गावांना उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी जॅकवेलजवळ बंधारा टाकून नदीचे पाणी अडवण्यात येते. मागील वर्षी या बंधाऱ्यात साठलेला गाळही काढण्यात आला होता.गतवर्षी आॅगस्टमध्ये कोतुर्डे धरणाच्या संरक्षण भिंतीला बोगदा पडल्याने पाणी गळती झाली होती. त्यानंतर धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्याने धरणातून नदीला पाणी सोडणे बंद क रण्यात आले. यामुळे दासगांव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर आणि गांधारपाले या गावांच्या नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. महाड पं. स. मार्फत टँकरद्वारे एक दिवस आड करून या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)