जलस्रोत शुद्धीकरणासाठी पावसाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 19, 2015 02:51 IST2015-06-19T02:51:45+5:302015-06-19T02:51:45+5:30
महाड-बिरवाडी एमआयडीसीमधील श्रीहरी केमिकल्स या रसायननिर्मिती कारखान्याने गेल्या मंगळवारी कारखान्यातील घातक रसायनमिश्रित सांडपाणी

जलस्रोत शुद्धीकरणासाठी पावसाची प्रतीक्षा
जयंत धुळप, अलिबाग
महाड-बिरवाडी एमआयडीसीमधील श्रीहरी केमिकल्स या रसायननिर्मिती कारखान्याने गेल्या मंगळवारी कारखान्यातील घातक रसायनमिश्रित सांडपाणी टेमघर नाल्याद्वारे थेट सावित्री नदीमध्ये सोडले. यामुळे सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले. मात्र पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पावसाची प्रतीक्षा पावसाची प्रतिक्षा करावी लागेल. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती बिरवाडी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.डी.सस्ते यांनी दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) पिण्याच्या पाण्याचा उद्भव (स्रोत)श्रीहरी केमिकल्सच्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाला आहे. यामुळे सुमारे १०० विविध कारखाने व परिसरातील १४ गावांचा पाणीपुरवठा बंद करावा लागल्याने मोठी आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता बिरवाडी धरणाजवळच्या सावित्री नदीच्याच अन्य जलस्रोतातून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यश आले असले तरी मूळ जलस्रोत अद्याप प्रदूषितच असल्याचे एमआयडीसीचे अभियंता आर.बी. सुळ यांनी सांगितले.
अतिवृष्टीची प्रतीक्षा
रानबाजीरे धरणातील पाणी सावित्री नदीत सोडून हा जलस्रोत शुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यामुळे समस्या न सुटल्याने आता अतिवृष्टीची प्रतीक्षा आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे २१ मिमी, पोलादपूर येथे ३४ मिमी तर महाड येथे २७ मिमी असे अल्पपर्जन्यमान झाल्याने सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. परिणामी घातक रसायन अद्याप नदीत साचून आहे. रसायनयुक्त पाणी थेट बाणकोट खाडीत पोहोचल्याने तेथील जलचरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.