मुंबई: पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार लेडीज स्पेशलमध्ये गुरुवारी संध्याकाळी स्टेशनवर उतरण्याच्या वादातून ज्योती प्रसाद सिंह आणि कविता रामचंद्र मेदाडकर या दोन महिला प्रवाशांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. ज्योती सिंह यांनी कविता मेदाडकर यांच्या डोक्यात मोबाइल मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. या दोघींविरोधात रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने गुन्हा नोंदवला असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिला स्पेशल लोकलमध्ये झालेल्या फ्रीस्टाइलचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. कविता यांनी 'लोकमत'ला सांगितले की, मीरारोडवरून संध्याकाळी ७.२७च्या महिला स्पेशल लोकलमध्ये विरारपर्यंत प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. त्यावेळी डब्यात पुढे जाण्यासाठी जागा नव्हती. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या ज्योतीला नायगाव स्टेशनवर उतरायचे असल्याने तिने मला आत सरकण्यास सांगितले. भाईंदरचे प्रवासी खाली उतरतील तेव्हाच आत जागा मिळेल, असे मी ज्योतीला म्हटले. त्यावेळी ज्योतीने माझ्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
डोक्यातून रक्त येऊ लागले. दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघींना भाईदर स्टेशनवर उतरविले. स्टेशनवर कविता यांच्यावर प्राथमिक उपचार केले. महिलांमधील या भांडणानंतर त्यांना भाईंदर स्टेशनवर उतरविण्यात आले, तेव्हा रेल्वे पोलिसांनी या भांडणाचा फायदा घेतला. या घटनेत कविता यांचे मंगळसूत्र तुटले ते सापडले नाही. यानंतर, तीन पोलिसांनी ज्योतीच्या भावाकडून पाच हजार रुपये घेतले. त्यातील दोन हजार कविता यांना दिले आणि उर्वरित तीन हजार तीन रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी खिशात घातले असे त्यांनी सांगितले.
तक्रार करण्यास नकारकविता यांनी सांगितले की, त्यांचे पती एका कंपनीत काम करतात. दोन मुलांचे शिक्षण, घरखर्च सांभाळण्यासाठी त्या मीरारोडमध्ये बेबी केअर वर्कर म्हणून काम करते. गुन्हा दाखल करून कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही. असे कोणासोबतही होऊ नये. लोकांनी लोकल ट्रेनमध्ये व्यवस्थित उभे राहून एकमेकांचा आदर करावा.
ज्योतीने दिला चुकीचा नंबरज्योती सिंह यांनी उपस्थित पोलिसांकडे नोंदविलेल्या मोबाइलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो चुकीचा असल्याचे समजले.
एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार नाहीविरार लेडीज स्पेशलमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये दोन्ही महिला प्रवाशांना कारवाईसाठी वसईरोड रेल्वे पोलिस ठाण्यामध्ये जाऊन गुन्हा नोंद करण्याबाबत सांगण्यात आले. दरम्यान, आमच्यात लोकलमधून उतरण्याच्या किरकोळ वादातून भांडण झाले असून, एकमेकांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा जबाब घेऊन त्यांना सोडण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.