वसईकरांनी नाकरले राजकीय पक्षांना
By Admin | Updated: June 18, 2015 00:37 IST2015-06-18T00:37:57+5:302015-06-18T00:37:57+5:30
नुकत्याच पार पडलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच प्रस्थापित पक्षांना नाकारले आहे.

वसईकरांनी नाकरले राजकीय पक्षांना
वसई : नुकत्याच पार पडलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्वच प्रस्थापित पक्षांना नाकारले आहे. लोकसभा निवडणुकांपुरतेच मतदारांना राजकीय पक्षांना (भाजपा) महत्त्व द्यावेसे वाटते मात्र, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना स्थानिक पक्ष असलेल्या बविआघाडीला भरभरून यश द्यावेसे वाटते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पक्षांनी जनतेच्या कल्याणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्याच्याने स्थानिक जनतेच्या हितासाठी काहीही होत नाही. एकदा निवडणूक पार पडली की, मतांची भीक मागणारे पक्ष आणि त्यांचे नेते व लोकप्रतिनिधी ढंकूनही पहात नाहीत. हा अनुभव अनेक वर्षे घेतल्या नंतर स्थानिक पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही अशाच मानसिकतेप्रती येथील जनता आली आहे. हे या महापालिकेच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. जनतेने २००९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणाऱ्या विवेक पंडित यांना आमदारकीची संधी देऊन पाहिली. परंतु त्यांनी साफ निराशा केल्यामुळे या वेळी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना दणदणीत बहुमतांनी विजयी केले व याच मानसिकतेवर शिक्कामोर्तब केले. संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पक्षांचे तीन आमदार एखाद्या प्रदेशात निवडून येण्याची व महापालिका आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्या आणि स्थानिक सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सगळ््या निवडणुका सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून स्थानिक पक्षाच्या उमेदवारांना त्यात भरघोस यश मतदारांनी देण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळेच बहुजन विकास आघाडीचे यश हे नजरेत भरणारे आहे. जात, धर्म,पंथ, लाट या कशालाही मतदारांनी महत्त्व दिले नाही. हे ही या निवडणुकीने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या २००९मधील निवडणुकीत विवेक पंडित यांच्या स्थानिक संघटनेला १८ जागी मतदारांनी विजयी केले होते. त्या संधीचा फायदा घेण्याऐवजी त्यांनी महापालिकेला विरोध करण्याची दुटप्पी भूमिका घेतली. म्हणजे सत्ता मिळविण्यासाठी महापालिका हवी पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ती नको या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांचा व त्यांच्या संघटनेचा जनाधार पाच वर्षातच ओसरला. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने ज्या ज्या ग्रामीण भागात महापालिकेला विरोध होता त्याच भागात महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे करून महापालिका कशी स्वागतार्ह आणि उपयुक्त आहे हे जनतेला दाखवून दिले. त्यामुळे जनतेला महापालिकेची उपयुक्तता तर कळालीच परंतु पंडित व त्यांची संघटना यांची निरर्थकताही जाणवली. त्यामुळेच बहुजन विकास आघाडीच्या पदारात या संघटनेच्या १८ जागा आणि त्याशिवाय वाढलेल्या जागा अशा जवळपास ४० ते ४५ जागा अधिक मिळाल्या. (विशेष प्रतिनिधी)