वसई-विरारला पाणी पुरविणारी धरणे कोरडी
By Admin | Updated: March 10, 2015 22:36 IST2015-03-10T22:36:53+5:302015-03-10T22:36:53+5:30
वसई विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या वगळता अन्य धरणातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. अशा परिस्थितीत परिसराला पुरेसा

वसई-विरारला पाणी पुरविणारी धरणे कोरडी
वसई : वसई विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या वगळता अन्य धरणातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. अशा परिस्थितीत परिसराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा याकरीता प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विरार पूर्वेस शिरवली बंधाऱ्यात तानसा नदीचे पाणी घेऊन ते विरार व अन्य परिसराला देण्यात येत आहे.
वसई-विरारला उसगांव, पेल्हार व सूर्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी दिले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील पाण्याची पातळी खाली जाऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवत असतो. यंदाही तशीच स्थिती असून पेल्हार धरणातील पाण्याची पातळी गेल्या वर्षापेक्षा यंदा २ मीटर खोल गेली आहे. तर दुसरीकडे उसगांव धरणातील पाणी उचलण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे उसगांव धरणातून पाणी देणे शक्य होत नाही. उपप्रदेशाची पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने लघुपाटबंधारे विभागाशी संपर्क साधून तानसा नदीचे पाणी सैतानी नदीच्या माध्यमातून शिरवली बंधाऱ्यात घेतले आहे व या बंधाऱ्यातून विरार परिसराला पाणी देण्यात येत आहे. परंतु हे पाणी बेचव असल्यामुळे नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नसल्यामुळे पाण्याची चव वेगळी लागत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे सूर्या प्रकल्पातून दैनंदिन कोटा (१०० द. ल. ली. ) उचलण्यात येतो असे पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता बी. एम. माचेवाड यांनी लोकमतला सांगितले. मार्च सुरूवातीलाच धरणातील पाणी खोलवर गेल्याने पुढील ३ महिन्यात हा परिसर पाणीटंचाईमध्ये होरपळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)