वसई-विरार महापालिकेची सोमवारी सोडत

By Admin | Updated: March 26, 2015 22:41 IST2015-03-26T22:41:13+5:302015-03-26T22:41:13+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागरचना प्रसिद्धी व आरक्षण सोडत येत्या सोमवारी ३० मार्च रोजी महानगरपालिका सभागृहात ठेवण्यात आली आहे.

Vasai-Virar Municipal Corporation on Monday | वसई-विरार महापालिकेची सोमवारी सोडत

वसई-विरार महापालिकेची सोमवारी सोडत

दीपक मोहिते ल्ल वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागरचना प्रसिद्धी व आरक्षण सोडत येत्या सोमवारी ३० मार्च रोजी महानगरपालिका सभागृहात ठेवण्यात आली आहे. जून महिन्यामध्ये महानगरपालिकेचा कालावधी संपुष्टात येत आहे. तत्पुर्वी निवडणुका घेण्यासाठी आयोगाने तयारी चालवली आहे. साधारणपणे मे च्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
नगररचना व आरक्षण सोडत घेण्यासंदर्भात आयोगाने सूचित केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व काँग्रेस यामध्ये जागा वाटपासंदर्भात समझोता झाला नव्हता. यंदाही बहुजन विकास आघाडी राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेऊन एक ला चलो रे किंवा भाजपशी जागा वाटपासंदर्भात समझोता करतील अशी शक्यता आहे. इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपा युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवत असली तरी वसई विरारमध्ये मात्र तशी युती होणे कठीण आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व भाजप अशी आगळीवेगळी आघाडी या निवडणुकीत मतदारांना पहावयास मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे. वसई विरार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाममात्र अस्तित्व असल्यामुळे राष्ट्रवादी यंदा काही ठराविक जागांवर उमेदवार उभे करतील. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३० ते ४० जागा लढवल्या होत्या परंतु सर्वच जागेवर त्यांचे उमेदवार प्रचंड मताच्या फरकाने पराभूत झाले. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत एखाद दुसऱ्या उमेदवाराने आपली अनामत रक्कम वाचवली.
दुसरीकडे काँगे्रसलाही त्या निवडणुकीत चांगलीच धोबीपछाड मिळाली. केवळ त्यांचे २ उमेदवार निवडून आले. त्या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी भुईसपाट झाले होते. भाजप-सेनेनेही युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती परंतु या दोघाही पक्षांना विशेष कामगिरी करता आली नाही. विरोधी पक्ष असलेल्या लोकहितवादी लिडर पार्टीचे मात्र बहुसंख्य नगरसेवक निवडून आले. ग्रामीण भागातील जनतेचा महानगरपालिकेतील गावांचा समावेशाप्रश्नी असलेल्या विरोधाचा लोकहितवादी पार्टीला चांगला फायदा झाला. परंतु यंदा तशी परिस्थिती नसल्यामुळे लोकहितवादी लिडर पार्टीला ही निवडणूक कठीण जाणार आहे.
गेल्या साडेचार वर्षात शहरी भागातील अनेक विकासकामे मार्गी लागल्यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला त्याचा फायदा मिळू शकतो. परंतु शहरातील पाण्याचा प्रश्न अद्याप न सुटल्यामुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदान यंत्राच्या माध्यमातुन व्यक्त होण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी विविध पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत परंतु अद्याप त्या कागदावरच असल्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. विरोधक या एकाच प्रश्नावर सत्ताधारी बविआला प्रचारादरम्यान घेरतील असा अंदाज राजकीय वर्तूळात व्यक्त होत आहे.

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.