वसईला घडयाळाचा ‘बाय’
By Admin | Updated: September 29, 2014 03:03 IST2014-09-29T03:03:49+5:302014-09-29T03:03:49+5:30
पालघर जिल्हयातील बहुजन विकास आघाडीने लढवलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तीन महत्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले नाहीत

वसईला घडयाळाचा ‘बाय’
वसई : पालघर जिल्हयातील बहुजन विकास आघाडीने लढवलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तीन महत्वाच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले नाहीत. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी काँग्रेस पक्षाचा सहयोगी पक्ष असतानाही काँग्रेसने या तीनही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगे्रस पक्षासमवेत बहुजन विकास आघाडीचा जागांसंदर्भात समझोता झाला होता. त्यानुसार नालासोपारा व वसई येथे उमेदवार न उभे करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसने वसई येथे उमेदवार रिंगणात उतरवला. त्याचा फटका काही प्रमाणात बहुजन विकास आघाडीला बसला व त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. यंदा मात्र बहुजन विकास आघाडीने पालघर जिल्हयातील सहा जागांसोबत अन्य ठिकाणीही उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेस समवेत जागा वाटपावर समझोता होऊ शकला नाही. त्यामुळे पालघर जिल्हयात सहाही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. तर दुसरीकडे जिल्हयातील वसई, नालासोपारा व बोईसर या तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीने मात्र उमेदवार दिले नाहीत. उर्वरीत डहाणू, पालघर व विक्रमगड या जागा मात्र लढवल्या आहेत. एकंदरीत निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडी कोणाला पाठींबा देते याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. गेली ५ वर्षे काँगे्रस पक्षाचा सहयोगी सदस्य असताना राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा महत्वाच्या तीन जागा सोडण्यासंदर्भात आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तिन्ही मतदारसंघात ताकद नगण्य झाली आहे. (प्रतिनिधी)