यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा ८१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, एकट्या मुंबई व एमएमआरमध्ये आजघडीला १६ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या तीन वर्षांत दुप्पट केली जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
‘लोकमत’शी बोलताना मंत्री वैष्णव म्हणाले की, मुंबईतील सर्व लोकलना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल. लोकल गाड्यांना मेट्रोसारखे उत्तम चकचकीत डबे लावण्याचा विचार सुरू आहे. सर्वच लोकल एसी करण्याचा विचार राजकीय विरोधामुळे बाजूला ठेवावा लागला असला, तरी जास्तीत जास्त गाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत सध्या लोकलच्या सुमारे ३,२०० फेऱ्या आहेत, दोन लोकलमधील अंतर कमी करणे, लोकलची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री वैष्णव म्हणाले. मुंब्रा स्थानकानजीक अलीकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकल विस्ताराबाबत माहिती दिली.
मुंबईत अतिरिक्त लोकल ट्रेनअश्विनी वैष्णव म्हणाले की, टप्प्याटप्प्याने सुमारे ३०० अतिरिक्त लोकल ट्रेन सेवा जोडल्या जातील, ज्यामुळे सध्याच्या तीन हजार सेवांच्या दैनंदिन कामकाजाचा विस्तार होईल. सुमारे ३०० किलोमीटर नवीन ट्रॅक टाकण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे वाढीव सेवा शक्य होतील. सन २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे, यूपीए सरकारच्या काळातील तरतूदीपेक्षा ही रक्कम २० पट जास्त आहे.
अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?मुंबईतील दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांवरून अडीच मिनिटांवर आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणार आहोत. अशा प्रकारची यंत्रणा असणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरेल. सध्या रोज ३,२०० उपनगरी लोकलमधून ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडण्यात येईल. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल. त्याचबरोबर ३५० नवीन एसी लोकल सुरू करणार आहोत. पनवेल - कळंबोली येथे एक लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल बांधणार. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांचा प्रवास सुकर होण्यासाठी ३४२ विशेष रेल्वेगाड्या सोडणार.