अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा
By Admin | Updated: February 3, 2016 02:35 IST2016-02-03T02:35:58+5:302016-02-03T02:35:58+5:30
जोगेश्वरीतील रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असून, पादचारी वर्गाला त्यांचा नाहक त्रास होत आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा
मुंबई : जोगेश्वरीतील रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असून, पादचारी वर्गाला त्यांचा नाहक त्रास होत आहे.
रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात भाजी आणि फळविक्रेते रस्ता अडवून बसतात. त्यांची संख्या २०० च्या घरात आहे. शिवाय दिवसागणिक यात भर पडत आहे. सायंकाळी तर फेरीवाले कहर करत असून, रस्त्याच्या मध्यभागापर्यंत त्यांची मजल वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजी आणि फळे उतरविणारे मालाचे ट्रकही येथे तासनतास उभे असल्याने परिसर विद्रूप झाला आहे. या प्रकरणी महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याने स्थानिकांनी महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे.
‘नवलकवाडी’ ही भाजी मंडई तीन वर्षांपासून दुरवस्थेत आहे. येथे नव्याने मंडई बांधून देण्यात येईल आणि तेथे जागा मिळेल, अशी आशा या फेरीवाल्यांना आहे. म्हणून ते आपली जागा अडवून बसत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. (प्रतिनिधी)जोगेश्वरीमधील भाजी मंडई १९७१ साली बांधलेली आहे. सध्या ती धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे फेरीवाले रस्त्यांवर बसत असतील. नव्या मंडईसाठीचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला असून, नवी मंडई लवकरच बांधली जाईल. मात्र स्थानिकांची तक्रार असेल तर फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल.
- सुभाष सावंत,
साहाय्यक बाजार अधीक्षक