Join us  

Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 7:39 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

मुंबई - अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून इशारा दिला आहे. ''शिवसैनिकांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही. नेभळट सरकार व पुचाट कायदा काय करतोय ते पाहू. नाहीतर नगरच्या पर्यटन केंद्रातील उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील. नगरचा नरक झाला आहे. नव्या पर्यटन जिल्हय़ात येणारे पर्यटक जिवंत परत जाऊ द्या, हीच संत साईबाबाचरणी प्रार्थना!'', अशा शब्दांत त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे.  ''वाल्याचा शुद्ध वाल्मीकी करण्याचा जोडधंदा २०१४ पासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुरू केला. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल'', अशी बोचरी टीकादेखील केली आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय?नगर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच जाहीर होईल, अशी  माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. ‘संतांची भूमी’ अशीही नगर जिल्हय़ाची ओळख आहे. साईबाबांचे शिर्डी नगर जिल्हय़ातच येते व जगभरातून लाखो भाविक, पर्यटक नगर जिल्हय़ात येत असतात, पण गेल्या चार दिवसांपासून ‘नगर’ गाजते आहे ते तेथील हिंसाचारामुळे, राजकीय दहशतवाद व त्यानंतर झालेल्या हत्याकांडांमुळे. हे प्रकरण देशभर गाजत आहे. त्यामुळे नगर वेगळ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र झाले आहे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे ‘बाप-बेटे’ आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप हे नवे ‘संतमहात्मे’ उदयास आले आहेत. वाल्याचा शुद्ध वाल्मीकी करण्याचा जोडधंदा २०१४ पासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुरू केला. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल. नगर जिल्ह्यातील केडगाव येथे संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून झाले. संतांची भूमी रक्ताने भिजली. जिल्ह्यात प्रचंड दहशत निर्माण झाली. हत्या झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह पाच-सहा तास जागेवरच पडून होते, पण पोलीस पोहोचले नाहीत. वातावरण पेटू लागले तेव्हा पोलीस पोहोचले. 

या प्रकरणात तीन आमदार खुनाच्या आरोपाखाली अटकेत आहेत. आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात चौकशीसाठी पोलिसांनी त्याच दिवशी बोलावले तेव्हा जगताप समर्थकांनी जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयावर हल्ला केला, आमदारांना तिथून पळवून नेले व पोलीस तंबाखू चोळत बसले. हिंदी सिनेमात अशी दृश्ये नेहमीच दिसतात. नगरकरांना ते सर्व प्रत्यक्ष पाहावे लागले. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे हे धिंडवडे आहेत. राज्यात सरकार आहे, पण गृहमंत्री आहे काय, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला तर नवल नाही. अब्रू वाचविण्यासाठी एका तरुणीने गच्चीवरून उडी मारल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. अशा असंख्य घटना रोज घडत आहेत आणि सरकार निवडणुका, पक्षविस्ताराच्या कार्यात गुंतून पडले आहे. भीमा-कोरेगाव  प्रकरणात महाराष्ट्र पेटला व सरकारच्या इज्जतीची लक्तरे निघाली. आता हे नगरचे हत्याकांड घडले आहे. गुन्हेगार व राजकारणी यांच्या संबंधांवर एक व्होरा अहवाल काही वर्षांपूर्वी आला. या व्होरा कमिशनची पुढची पाने नगर जिल्ह्यात सापडली आहेत. महाराष्ट्रातील गुंडांचे पोशिंदे कोण आहेत व गुंडांना सध्या कोणाचा राजाश्रय प्राप्त आहे हे उघड झाले आहे.

सत्ता स्थापनेसाठी ‘वाल्या मंडळां’ना ज्यांनी पायघड्या घातल्या तेच आजच्या परिस्थितीस जबाबदार आहेत. सहकारसम्राटांची दहशत नगरसारख्या जिल्हय़ात होती. त्या दहशतीवर कडी करणारा नवा दहशतवाद राजकीय कृपेने सुरू झाला आहे. पोलीस यंत्रणेचा वापर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कमी आणि राजकीय लाभ, पक्षविस्तार व विरोधकांची नरडी दाबण्यासाठी होऊ लागला की नगरसारख्या नव्या पर्यटन केंद्रांचा उदय होतो. विरोधी पक्षांत साप, उंदीर, कोल्हे, लांडगे वगैरे आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शहा यांनी नुकतेच जाहीर केले. यातले अनेक ‘प्राणी’ २०१४ नंतर भाजपने स्वतःच्या तंबूत घेतले. याच प्राण्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची लांडगेतोड चालवली आहे. नगरचे हत्याकांड हा महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. खुनाचे शिंतोडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अंगावर उडाले. अजित पवार व धनंजय मुंडे यांचे ‘हल्लाबोल’ नाटय़ महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्या दोन आमदारांनी भाजप आमदारांच्या मदतीने केडगावात ‘हल्लाबोल’ केले, दोन निरपराध माणसे मरण पावली. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही. नेभळट सरकार व पुचाट कायदा काय करतोय ते पाहू. नाहीतर नगरच्या पर्यटन केंद्रातील उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील. नगरचा नरक झाला आहे. नव्या पर्यटन जिल्हय़ात येणारे पर्यटक जिवंत परत जाऊ द्या, हीच संत साईबाबाचरणी प्रार्थना!

टॅग्स :केडगाव दुहेरी हत्याकांडआ. शिवाजी कर्डिलेउद्धव ठाकरे