Join us  

तानाजी 'द अनसंग वॉरियर' चित्रपटावर उदयनराजे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 8:06 PM

तानाजी चित्रपट महाराष्ट्राची आणि मराठी योद्धयाची वीरता जगासमोर मांडत आहे.

मुंबई:  तानाजी 'द अनसंग वॉरियर' देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट महाराष्ट्राची आणि मराठी योद्धयाची वीरता जगासमोर मांडत आहे. तानाजी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील फेसबुकद्वारे या चित्रपटाचे कौतुक केले आहे.  तसेच आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. 

उदयनराजे यांनी फेसबुकवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शूरवीर सहकारी सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित "तानाजी द अनसंग वॉरियर" चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला यामध्ये सिनेअभिनेता अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास देशासमोर सादर केला याबद्दल प्रथम त्यांचे आभार. आज आपण जे स्वराज्य पाहतोय या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे यांच्यासह अनेक शुरवीर मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली व आपल्या प्राणांची आहुती दिली हा इतिहास व पराक्रम देशातील नवतरुणांच्या मनात व काळजात भिंबवणे अत्यावश्यक झाले असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. तसेच "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तसेच यापुढे ही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील अशी अपेक्षा उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रात तानाजी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गड आला पण सिंह गेला असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांच्या मृत्युनंतर काढले होते. तर, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणत तानाजी मालुसरे आपल्या कर्तव्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठीजनांची अस्मिता या चित्रपटाबद्दल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष या चित्रपटातून मिळणार आहे. 

तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ही कथा आपण शालेय जीवनापासून वाचत आलो आहोत. हीच कथा अतिशय भव्यरित्या तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण, काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :उदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराजतानाजीअजय देवगणमहाराष्ट्र