मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाणिज शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. पाचव्या सत्राचा निकाल हा ६०.९२ टक्के लागला असून सहाव्या सत्राचा निकाल ६५.५६ टक्के इतका लागला आहे. आतापर्यंत ४३२ अभ्यासक्रमांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. ३१ आॅगस्टपर्यंत विद्यापीठाला अजून ४५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिकांचा डोंगर तपासण्यासाठी आता विद्यापीठ अन्य विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य शाखेचे निकालच रखडले. सध्या विद्यापीठाला ४१ हजार १०५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. तर आयडॉलच्या ५८ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. गणेशोत्सवापासून उत्तरपत्रिका तपासणीचा वेग मंदावला आहे. रविवारी ८३ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते. त्यांनी ४ हजार ३४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. यात आयडॉलच्या वाणिज्यच्या २,६८४ तर, वाणिज्य नियमित अभ्यासक्रमाच्या १,६२१ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.
टी.वाय.बी.कॉमचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:25 IST