मढच्या दोन बोटींना मिळाली जलसमाधी
By Admin | Updated: December 22, 2014 02:42 IST2014-12-22T02:42:04+5:302014-12-22T02:42:04+5:30
गेल्या मंगळवारी मढ कोळीवाड्यातील दोन मच्छीमार बोटींना खोल समुद्रात जलसमाधी मिळाली

मढच्या दोन बोटींना मिळाली जलसमाधी
मालाड : गेल्या मंगळवारी मढ कोळीवाड्यातील दोन मच्छीमार बोटींना खोल समुद्रात जलसमाधी मिळाली. एकच दिवशी बोटी बुडण्याच्या दोन दुर्घटना घडल्यामुळे मढच्या मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दुर्घटनेतील एक खलाशी अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
मढच्या श्रीमती भानुबाई प्रभाकर कोळी यांच्या मालिकीची ‘यश देवता’ आयएनडी-एमएच-२-एमएम- ४३८७ ही मासेमारी बोट खोल समुद्रात गेली होती. परतत असताना अचानक पूर्वेकडून वादळी वारे सुरू झाले. त्यात बोटीचे इंजिन बंद पडून बोटीत पाणी शिरले. पहाटे दोनच्या सुमारास या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीवरील चार खलाशांना अन्य बोटीने वाचवले होते. मात्र एक खलाशी अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली.तर दुसऱ्या घटनेत मढमधील श्रीमती रोहिणी सागर वासावे यांच्या मालिकची ‘श्री हरबादेवी’ आयएनडी-एमएच-२-एमएम १५०१ ही मासेमारी बोट बुडाली. मात्र या बोटीवरील पाच खलाशी सुखरूप वाचले आहेत. या दोन घटनांमुळे मढ कोळीवाड्यातील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बोटीच्या दोन कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने त्यांना त्वरित प्रत्येकी ५ लाख रु पये आर्थिक मदत द्यावी तसेच बेपत्ता खलाशाचा शोध घ्यावा, अशी मागणी किरण कोळी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)