आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 12, 2014 01:57 IST2014-09-12T01:57:28+5:302014-09-12T01:57:28+5:30
कल्याण तालुक्यातील कांबा, वरप परिसरातील आदिवासींच्या शेकडो एकर शेतजमिनी बळकावणे शक्य होत नसल्याचे लक्षात येताच

आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न
कांबा: कल्याण तालुक्यातील कांबा, वरप परिसरातील आदिवासींच्या शेकडो एकर शेतजमिनी बळकावणे शक्य होत नसल्याचे लक्षात येताच काही भूमाफियांनी उद्योगधंद्याच्या नावाखाली त्यांची मागणी शासनदरबारी लावून धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आदिवासींच्या शेतजमिनींची खरेदी-विक्री कायद्यानुसार होत नाही. तरीही, त्यांची खरेदी केल्याचा दावा करून त्यावर मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला. याशिवाय, संंबंधित शेतजमिनीसह आदिवासींच्या स्मशानभूमीवर विविध कारखाने सुरू करून मोठमोठे गोडाऊनदेखील उभे केले आहेत. याविरोधात बाळाराम शिद, महादू शिद यांनी मंत्रालयात तक्रार केली. त्याअंती झालेल्या चौकशीत संबंधित कारखान्यांसह गोडाऊन जमीनदोस्त करण्याचे आदेश मंत्रालयीन पातळीवर देण्यात आले आहेत. पण, संबंधित गोडाऊन केवळ सील केले असले तरी ते मात्र अद्याप जमीनदोस्त झाले नाहीत.
याशिवाय, या जमिनी खरेदी करण्यासाठी जोडण्यात आलेला ‘ना शेती दाखला’ हादेखील बोगस असल्याचे निदर्शनात आल्यामुळे संबंधित शेतजमिनी शासनजमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर त्या जमादेखील करण्यात आल्या. परंतु या भूमाफियांनी नामी शक्कल लढवून उद्योगधंद्यासाठी संबंधित शेतजमिनींची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे. याविषयी चौकशी केली असता संबंधित मागणी फेटाळल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. या जमिनी बळकवण्याविरोधात जिल्हा नियोजन बैठकीत वेळोवेळी चर्चादेखील झाली आहे. त्यानुसार, कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. पण, अद्याप काहीही झाले नाही.