मुंबईतल्या भूलभुलैयाचा खरा चेहरा

By Admin | Updated: May 31, 2014 11:14 IST2014-05-31T11:13:41+5:302014-05-31T11:14:14+5:30

रोजगारासाठी बाहेरच्या राज्यांतून मुंबईत अनेक लोक येत असतात. मुंबईचा भूलभुलैया आकर्षित करणारा असला तरी इथे आल्यावर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

The true face of the labyrinth of Mumbai | मुंबईतल्या भूलभुलैयाचा खरा चेहरा

मुंबईतल्या भूलभुलैयाचा खरा चेहरा

>हिंदी चित्रपट - अनुज अलंकार
 
रोजगारासाठी बाहेरच्या राज्यांतून मुंबईत अनेक लोक येत असतात. मुंबईचा भूलभुलैया आकर्षित करणारा असला तरी इथे आल्यावर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा आशयावर अनेक चित्रपट तयार झाले आहेत. महेश भट्ट यांच्या कंपनीत बनलेला तसेच हन्सल मेहताने दिग्दर्शित केलेला सिटीलाइट’ याच प्रकारातला चित्रपट आहे. मुंबईकरांच्या जगण्याचा प्रत्येक पैलू हा चित्रपट संवेदनशीलपणे दाखवतो. 
राजस्थानातील एका गावात राहणार्‍या दीपक सिंह (राजकुमार राव) ची ही कथा. तिथे तो आपली बायको राधा (पत्रलेखा) आणि मुलीबरोबर राहत असतो. तेथे पैशांची चणचण आणि कर्जाचा डोंगरही त्याच्यावर असतो. या सगळ्यांतून मुक्त होण्यासाठी काहीतरी चांगले काम मिळेल, या आशेने तो गाव सोडून मुंबईत येतो. एका अनोळखी शहरात बायको, मुलीसोबत आल्यावर त्याला या मायानगरीची खर्‍या अर्थाने ओळख होते. सुरुवातीच्या काळात अनेकदा त्याची फसवणूक होते. त्यानंतर, त्याला सिक्युरिटी एजन्सीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी मिळते. तिथे पैशांच्या पेट्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाते.  एजन्सीतला वरिष्ठ अधिकारी (मानव कौल) त्याला या कामात मदत करतो. नंतर, त्यांच्यात चांगली मैत्रीही होते. एक दिवस या मैत्रीमुळे आपण फार मोठय़ा संकटात अडकलो आहोत, याची जाणीव दीपकला होते. यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना दीपकचा मृत्यू होतो आणि त्याच्या बायको आणि मुलीला गावाकडे परतावे लागते.
चित्रपटाची वैशिष्ट्ये - हन्सल मेहतांची कथा खूपच छोटी आहे. अशा प्रकारच्या कथांवर या आधी अनेक चित्रपट आले आहेत. तरीही, हा चित्रपट मात्र उजवा ठरतो. कथेत संवेदनशीलता आणि थ्रिलर यांचे योग्य संतुलन राखण्यात मेहता यशस्वी ठरले आहेत. पूर्वार्धात चित्रपट हळूहळू पुढे सरकत असला तरी उत्सुकता वाढवतो. मात्र, खरी मजा येते ती उत्तरार्धात. दीपक सिक्युरिटी एजन्सीत नोकरीला लागल्यानंतर थ्रिलरला खर्‍या अर्थाने सुरुवात होते आणि संवेदनशीलतेचा योग्य मेळ साधत वेगाने तो पुढे सरकतो. दीपकच्या भूमिकेतील राजकुमार रावने पुन्हा आपण उत्कृष्ट कलाकार असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या अभिनयातील सहजपणा चकित करतो. दीपकच्या बायकोच्या भूमिकेतील अभिनेत्री पत्रलेखाने बरे काम केले आहे. ग्लॅमरची गरज भागवत नसली तरी संवेदनशीलदृष्ट्या तिने बाजी मारली आहे. सिक्युरिटी एजन्सीतला दीपकच्या वरिष्ठ सहकार्‍याच्या भूमिकेतील मानव कौलही प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे. त्याची संवादफेक लाजवाब आहे. चित्रपटाचे संगीत चांगले आहे. रश्मी सिंगची गीते आणि जीत गांगुलीचे संगीत प्रभाव पाडते. सर्वच गाणी ऐकायला चांगली आहेत. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट उत्तम आहे.मेहता दिग्दर्शक म्हणून बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. 
सिटीलाईट मुंबईतल्या भूलभुलैयापाठचा खरा चेहरा समोर आणतो. त्यामुळे हा चित्रपट आवर्जून बघण्यासारखा आहे.
 
का पाहावा ?
संगीत, राजकुमार रावचा 
उत्कृष्ट अभिनय आणि 
परफेक्ट थ्रिलरपट अनुभवण्यासाठी
 
का पाहू नये ?
पूर्वार्ध संथ असल्याने कंटाळा येऊ शकतो. मोठे कलाकार चित्रपटात नाहीत.
 
चित्रपटाच्या उणिवा :
थ्रिलर चित्रपट आवडणार्‍या प्रेक्षकांना दुसरा भाग जास्त आवडेल. कारण, पहिल्या भागात तसे काही पाहण्यासारखे नाही. पत्रलेखाची अभिनयातील झेप र्मयादित आहे. स्क्रीनप्लेही अनेक ठिकाणी भरकटतो. 

Web Title: The true face of the labyrinth of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.