आदिवासींची आगोटीची खरेदी सुरु
By Admin | Updated: May 16, 2014 02:19 IST2014-05-16T02:19:36+5:302014-05-16T02:19:36+5:30
जून महिन्यापासून विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यातील आदिवासी व शेतकरीवर्ग कामाला लागतो. त्यामुळे त्याला पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहाट करण्यास वेळ मिळत नाही.

आदिवासींची आगोटीची खरेदी सुरु
राहुल वाडेकर, तलवाडा - जून महिन्यापासून विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यातील आदिवासी व शेतकरीवर्ग कामाला लागतो. त्यामुळे त्याला पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहाट करण्यास वेळ मिळत नाही. याकरिता तो पावसाळ्यापूर्वीच मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून तीन ते चार महिने पुरेल असा साठा करून ठेवतो. पावसाळ्याच्या हंगामाला शेतकरी आगोट म्हणून संबोधत असतात. पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांनी, आदिवासींनी आगोटीच्या खरेदीस सुरुवात केली आहे. प्रत्येक गावपाड्यामध्ये भरणार्या आठवडा बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकर्यांची झुंबड उडताना दिसत आहे. आज महागाईचा भस्मासुर डोक्यावर असतानाही खरेदीमात्र केली जात आहे. कारण चार महिने पाऊस चालू झाल्यावर येथे भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरिता अडचणी निर्माण होत असतात. कारण ग्रामीण भागात पावसाळ्यात पाहिजे ती वस्तू मिळत नसते. पावसाळ्याच्या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोरदारपणे या महिन्यात सुरू असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असतो. सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदि विविध भागातून मावरे विक्रेत्या महिला विक्रमगड व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा व मलवाडा या खेड्यापाड्यात गावात आठवडी बाजारात येवून आपले दुकान थाटत असल्याने अगर इतर दिवशीही डोक्यावर टोपले घेवून गावोगावी फिरत असल्याने मावरे खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे आदिवासी ग्राहकांची, महिलांची झुंबड उडत आहे. सुकी मासळी ही ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या जेवणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दर वाढले असले तरी सुकी मासळी खरेदी करणार्या ग्राहकांची गर्दी काही कमी झालेली नाही, असे चित्र सद्यस्थितीत पहावयास मिळते. पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही व शेतीव्यतिरिक्त कामासाठी वेळ मिळत नसल्याने यावेळी मे महिन्यात खवय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो. पावसात घाई असल्याने उन्हाळ्यातच बोंबील, कोलीम, बांगडे, सुरमई, बगीसक ट, मांदीला, सुकट, खारे अशा विविध वाणांच्या प्रकारच्या सुक्या मासळीचा समावेश असलेला पालघर, वसई, सातपाटी, डहाणू, वाणगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छीमारी व्यवसाय चालतो.