Join us  

प्रवासात खर्च होतो ६५ टक्के अतिरिक्त वेळ; मुंबईकरांना वाहतूककोंडीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:07 AM

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवास कंटाळवाणा तसेच वेळखाऊ होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : मुंबई हे जगातील सर्वाधिक गर्दीपैकी एक शहर असून, वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवासामध्ये ६५ टक्के अतिरिक्त वेळ खर्च होत असल्याचे एका खासगी संस्थेच्या २०१९ च्या अहवालातून समोर आले आहे.वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा प्रवास कंटाळवाणा तसेच वेळखाऊ होत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. मात्र मुंबईला पायाभूत सेवासुविधा पुरविण्यात महापालिका कमी पडत आहे. यावर उपाय म्हणून परिवहन पद्धतींमधील समन्वय वाढवणे, बससाठी सुधारित मार्ग तयार करणे गरजेचे आहे. बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत असतानाच प्रवाशांची संख्या कमी होत असल्याचे आकडे अहवालातून समोर आले आहेत. दररोज मुंबईत ३ हजार १९८ बेस्ट बस धावत असून, सप्टेंबर २०१९ पर्यंत बस वापरकर्त्यांची संख्या १ लाख २५ हजार ९२६ आहे. ३४ हजार दिव्यांग बेस्ट बसचा वापर करतात. मात्र, मुंबापुरीची लोकसंख्या वाढत असतानाच आजही बेस्ट बसचा वापर कमी केला जातो. वाहनांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. याच कोंडीमुळे मुंबईकरांचा ६५ टक्के अतिरिक्त वेळ वाया जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.परिणामी, वाहतूककोंडीतून वाचण्यासह प्रदूषणाचे प्रमाण कमी करायचे असेल आणि पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागेल; शिवाय पायाभूत सेवासुविधा आणखी बळकट कराव्या लागतील, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.बेस्टच्या अर्थसंकल्पाला मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा एक भाग मानले पाहिजे. मुंबईच्या रस्त्यावर रोज शेकडो कारची भर पडत असते. परिणामी, रस्ते रुंद करतानाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कसा अधिकाधिक वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे.- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन

टॅग्स :मुंबई