फणसाड अभयारण्यात अखेर ट्रॅप कॅमेरे
By Admin | Updated: February 3, 2015 23:02 IST2015-02-03T23:02:50+5:302015-02-03T23:02:50+5:30
सुमारे ५४ किलोमीटर परिसरात फणसाड अभयारण्याचे विस्थापित क्षेत्र असून याच अभयारण्याला लागून सुमारे २४ गावांची वस्ती आहे.

फणसाड अभयारण्यात अखेर ट्रॅप कॅमेरे
वनमजुरांच्या सुरक्षेचे काय? : दोघांच्या मृत्यूनंतर वनविभागाला आली जाग
संजय करडे ल्ल नांदगाव
सुमारे ५४ किलोमीटर परिसरात फणसाड अभयारण्याचे विस्थापित क्षेत्र असून याच अभयारण्याला लागून सुमारे २४ गावांची वस्ती आहे. नवाबकालीन संरक्षित अभयारण्य घनदाट असून उंच आणि मोठे वृक्ष व वन्यजीव प्राणी भरपूर प्रमाणात आहेत. नुकतीच या अभयारण्यात हिंस्त्र पशूच्या हल्ल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनखातेही आता सरसावले असून जंगलात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
दोघांच्या मृत्यूनंतर फणसाड अभयारण्यातील कर्मचारी सतर्क झाले असून दोन ट्रॅप कॅमेरे वेलासे परिसरात व अन्य भागात बसविण्यात आले आहेत. वनखात्याकडून हे दोन कॅमेरे दोन महिन्यांपासून आलेले आहेत. परंतु धूळ खात पडलेल्या या कॅमेऱ्यांची आठवण दोघांच्या मृत्यूनंतरच वनखात्याला झाली. ५४ किलोमीटर परिक्षेत्र असणाऱ्या या भागात फक्त दोन कॅमेरे म्हणजे रोगावर तात्पुरते औषध असल्यासारखाच प्रकार आहे. ४० फुटांपर्यंत वन्यजीव प्राणी अथवा शिकारी या कॅमेराक्षेत्रातून गेल्यास दिवस अथवा रात्री हा कॅमेरा कैद करणार आहे. मोठे परिक्षेत्र असल्याने खूप कॅमेऱ्यांची गरज असूनही फक्त दोन कॅमेरे म्हणजे तात्पुरता इलाज मानला जात आहे.
रानडुकरांच्या हल्ल्यातूनच त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे वनखाते सांगत आहे, परंतु प्रत्यक्षदर्शी या जंगलांच्या शेजारी राहणारे लोक हे मान्य करण्यास तयार नाहीत. हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी बिबट्याने वासरु व कुत्रे नेताना पाहिलेले आहे.
कुटुंबाला भरपाई
४फणसाड अभयारण्याच्या सहाय्यक वनसंरक्षक सरोज गवस यांनी सांगितले,मृत व्यक्तींच्या कुटुंबांना भरपाई देण्याविषयीची कार्यवाही सुरु आहे. अभयारण्यातील वनसंरक्षकांना बंदुका देण्यात आल्या होत्या, परंतु त्याही पोलिसांच्या ताब्यात होत्या.