Join us  

माहुलवासीयांसाठी ३०० घरांचे हस्तांतर - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 7:13 AM

माहुल येथील प्रदूषणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली ३०० घरे म्हाडाने दहा दिवसांत मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावीत.

मुंबई : माहुल येथील प्रदूषणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली ३०० घरे म्हाडाने दहा दिवसांत मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावीत. पालिकेने या घरांमध्ये अतिप्रदूषित भागातील कुटुंबांच्या पुनवर्सनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी दिली.माहुल येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ठाकरे म्हणाले की, विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करणे आणि अतिप्रदूषित भागातील लोकांचे पुनर्वसन हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने आज म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची बैठक झाली. सध्या उपलब्ध असलेली ३०० घरे म्हाडाने १ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेकडे हस्तांतरित करावीत. त्यानंतर, महापालिकेने अतिप्रदूषणग्रस्त भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनाचेही प्राधान्यक्रमाने नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.प्रदूषण नियंत्रित करणे काळाची गरज आहे. या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल. माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पूर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी करणे, उद्योगांकडून सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करून घेणे आदींबाबत चर्चा करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.या बैठकीस गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई