आज महासभेत ‘डीपी’
By Admin | Updated: May 27, 2016 01:46 IST2016-05-27T01:46:12+5:302016-05-27T01:46:12+5:30
विकास नियोजन आराखड्याचा सुधारित मसुदा अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे़ हा आराखडा पालिका महासभेच्या पटलावर शुक्रवारी मांडण्यात येणार आहे़ मात्र यामधील भाजपाची छाप

आज महासभेत ‘डीपी’
मुंबई : विकास नियोजन आराखड्याचा सुधारित मसुदा अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे़ हा आराखडा पालिका महासभेच्या पटलावर शुक्रवारी मांडण्यात येणार आहे़ मात्र यामधील भाजपाची छाप असलेल्या अनेक तरतुदींना शिवसेनेने विरोध दर्शविला असल्याने मित्रपक्षांमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़
सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांमध्ये शहराच्या विकासाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला होता़ मात्र यामध्ये अनेक त्रुटी असल्याने सर्वच स्तरांतून विरोध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़
त्यानुसार माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांची नियुक्ती करण्यात आली़ त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुधारित आराखडा तयार केला आहे़
यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचाही विचार करून बदल करण्यात आले आहेत़ या आराखड्यातील एक-एक भाग पालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहेत़़ आता नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी पालिकेच्या महासभेपुढे हा आराखडा मांडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
६० दिवसांची मुदत
आराखड्यातील तरतुदींवर आपले मत नोंदविण्यासाठी पालिकेने नियमानुसार आवाहन केले आहे़ त्यानुसार पालिकेच्या महासभेत हा आराखडा सादर झाल्यानंतर ६० दिवसांची मुदत देण्यात येईल़ या मुदतीत सर्वसामान्य नागरिकही आराखड्यांमधील शिफारशींवर हरकती व सूचना नोंदवू शकणार आहेत़
परवडणारी घरे बांधण्यासाठी
ना-विकास क्षेत्र, मिठागारांची जमीन वापरण्यास शिवसेनेचा विरोध आहे़ तसेच आरे कॉलनीतील मेट्रो कार शेड आणि वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक या शिफारशींनाही विरोध करण्यात आला आहे़ व्यावसायिक बांधकामांना वाढीव एफएसआय देण्याचा भाजपाचाच अजेंडा असल्याने शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पालिकेच्या महासभेत रंगण्याची शक्यता आहे़